India vs Australia, 1st Test : भारतीय गोलंदाजांनी यजमान ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर बॅकफुटवर जाण्यास भार पाडले. टिच्चून मारा करताना भारतीय गोलंदाजांनी सातत्यानं ऑसी फलंदाजांवर दडपण निर्माण केलं. जसप्रीत बुमराह व आर अश्विन यांनी ऑसींना धक्के देताना त्यांचे पाच फलंदाज अवघ्या ७९ धावांत माघारी पाठवले. स्टीव्ह स्मिथला बाद करून अश्विननं भारताला मोठं यश मिळवून दिलं. त्यापाठोपाठ त्यानं ट्रॅव्हीस हेड व कॅमेरून ग्रीनला बाद केले. पण, ऑसींचा मार्नस लाबुशेन ( Marnus Labuschagne ) खेळपट्टीवर चिकटून बसला आहे. त्याला भारतीय क्षेत्ररक्षकांनी तीन जीवदान दिले आणि तेच आता महागात पडत असल्याचे दिसत आहेत.
टीम इंडियाच्या फलंदाजांनी पहिल्या कसोटीत निराशाजनक कामगिरी केली. चेतेश्वर पुजारा ( ४३), विराट कोहली ( ७४) आणि अजिंक्य रहाणे ( ४२) वगळता अन्य फलंदाजांनी ऑसी गोलंदाजांसमोर नांगी टाकली. पहिल्या दिवसाच्या ६ बाद २३३ धावसंख्येत अवघ्या ११ धावांची भर घालून टीम इंडियाचा पहिला डाव २४४ धावांवर गडगडला. मिचेल स्टार्कनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर पॅट कमिन्सने तीन आणि जोश हेझलवूड व नॅथन लियॉन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियालाही सावध सुरूवातीनंतर जसप्रीत बुमराहनं धक्के दिले. मॅथ्यू वेड ( ८) व जो बर्न्स ( ८) यांना बुमराहनं पायचीत केलं. भारतीय क्षेत्ररक्षकांनी मार्नस लाबुशेन व स्टीव्ह स्मिथ यांचे झेल सोडले. लाबुशेन व स्मिथ ही जोडी डोईजड होईल असे वाटत असताना विराटनं चेंडू आर अश्विनच्या ( R Ashwin) हाती सोपलला आणि त्यानं यश मिळवून दिलं. अश्विननं सुरुवातीला स्मिथला ( १) स्लीपमध्ये झेलबाद केलं, त्यानंतर स्वतःच्याच गोलंदाजीवर ट्रॅव्हीस हेडचा ( ७) झेल टिपला. त्यानंतर अश्विननं पदार्पणवीर कॅमेरून ग्रीनला (११) माघारी पाठवले.
चहापानाच्या ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियानं ५ बाद ९२ धावा केल्या आहेत. त्यापैकी ४६ धावा या लाबुशेननं केल्या आहेत आणि तो खेळपट्टीवर खिंड लढवताना दिसत आहे. भारतीय क्षेत्ररक्षकांनी त्याचे तीन सोपे झेल सोडले आणि तेच महागात पडतील की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाहा गचाळ क्षेत्ररक्षण....