Join us  

India vs Australia 1st T20 : ऑस्ट्रेलियाने शेवटच्या क्षणात भारताच्या तोंडचा घास पळवला

India vs Australia 1st T20 : 127 धावांचे माफक लक्ष्य असूनही अखेरपर्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने बाजी मारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 10:11 PM

Open in App

विशाखापट्टणम, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : 127 धावांचे माफक लक्ष्य असूनही अखेरपर्यंत रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात 3 विकेट राखून विजय मिळवताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ग्लेन मॅक्सवेल ( 56) आणि डी अॅर्सी शॉर्ट ( 37) यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. जस्प्रीत बुमराहने 19व्या षटकात पुन्हा एकदा उपयुक्त गोलंदाजी करताना जगातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे सिद्ध केले. पण, अखेरच्या षटकार उमेश यादवला विजय मिळवण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलियाने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला.

 

रोहित शर्मा ( 5) माघारी परतल्यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहली यांनी भारताच्या डावाला आकार दिला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करताना संघात झोकात पुनरागमन केले. न्यूझीलंड दौऱ्यानंतर विश्रांतीवर गेलेला कोहलीनं या सामन्यात विक्रमासह कमबॅक केले. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 500 धावांचा पल्ला ओलांडला आणि अशी कामगिरी करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला. 

कॉफी विथ करण 6 कार्यक्रमातील वक्तव्यामुळे निलंबनाची कारवाई झालेल्या राहुलनेही भारतीय संघाकडून आज पुनरागमन केले. कोहलीला मोठी खेळी करता आली नाही आणि तो 24 धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेल्या रिषभ पंतला ( 3) समन्वयाच्या अभावामुळे धावबाद होऊन माघारी परतावे लागले. महेंद्रसिंग धोनीनं संयमी खेळ केला, परंतु राहुल मोठे फटके मारण्याच्या नादात बाद झाला. राहुलने 36 चेंडूंत 50 धावा केल्या. दिनेश कार्तिक व कृणाल पांड्या काही चमक न दाखवता माघारी परतले. धोनी एका बाजूने टिकून खेळत होता, परंतु त्यालाही मोठे फटके मारता येत नव्हते. भारताला 20 षटकांत 126 धावांपर्यंतच मजल मारता आली. या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनकच झाली. मार्कस स्टॉयनिस आणि कर्णधार अॅरोन फिंच सलग दोन चेंडूवर माघारी परतले. मात्र, त्यानंतर भारताला तिसऱ्या विकेटसाठी 89 धावांपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. ग्लेन मॅक्सवेल आणि डी शॉर्ट यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी 84 धावांची भागीदारी केली. ही जोडी ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब करेल असे वाटत होते, परंतु युजवेंद्र चहलने मॅक्सवेलला माघारी पाठवले. मॅक्सवेलने 43 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकार खेचून 56 धावा केल्या. त्यानंतर शॉर्टही धावबाद होऊन माघारी परतल्याने सामन्यातील चुरस वाढली. शॉर्टने 37 चेंडूंत 37 धावा ( 5 चौकार ) केल्या. या विकेट्सनंतर भारताच्या सामन्यात पुनरागमन करणाच्या अपेक्षा उंचावल्या.. जस्प्रीत बुमराहने 19व्या षटकात पुन्हा एकदा उपयुक्त गोलंदाजी करताना जगातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे सिद्ध केले. पण, अखेरच्या षटकार उमेश यादवला विजय मिळवण्यात अपयश आले. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाजसप्रित बुमराहविराट कोहलीबीसीसीआयलोकेश राहुलरोहित शर्मामहेंद्रसिंह धोनी