Join us  

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेवर विराट सेनेचा कब्जा, भारतानं मिळवला शानदार विजय

जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेवरही सहजपणे कब्जा मिळवला आहे. रविवारी झालेल्या तिसऱ्या वनडेत विराट कोहलीच्या भारतीय संघाने 47.5 षटकांत ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून सहज विजय मिळवला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 9:21 PM

Open in App

इंदोर, दि. 24 - जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेवरही सहजपणे कब्जा मिळवला आहे. रविवारी झालेल्या तिसऱ्या वनडेत विराट कोहलीच्या भारतीय संघाने 47.5 षटकांत ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून सहज विजय मिळवला आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेची शतकी भागीदारी आणि हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 294 धावांच्या आव्हानाचा भारताने 48 षटकांतच फडशा पाडला. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. रोहित आणि रहाणेने आक्रमक अर्धशतके फटकावताना भारताला 139 धावांची सलामी दिली. मात्र हे दोघेही पाठोपाठ बाद झाले. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधवलाही मोठी खेळी करता आली नाही. मात्र हार्दिक पांड्याने घणाघाती फटकेबाजी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. पांड्या 78 धावा काढून बाद झाला असून, पांड्याला मॅन ऑफ द मॅच या किताबानं गौरवण्यात आलं आहे. 

या सामन्याची नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. फलंदाजी करताना वॉर्नर आणि फिंचने ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली. मात्र आक्रमक फलंदाजी करणारा वॉर्नर 42 धावा काढून हार्दिक पांड्याची शिकार झाला. त्यानंतर कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि अॅरॉन फिंचमध्ये 154 धावांची भागीदारी केली. शतकवीर अॅरॉन फिंच आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथने केलेल्या 154 धावांच्या भागीदारीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तिस-या एकदिवसीय सामन्यात भारताला 294 धावांचं आव्हान दिलं होतं. तीनशेचा टप्पा ओलांडण्याच्या प्रयत्नात असणा-या ऑस्ट्रेलियाला भारताने 293 धावांवर रोखलं. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर अॅरॉन फिंचने धडाकेबाज शतक झळकावताना सर्वाधिक 124 धावा फटकावल्या होत्या.या खेळीसाठी त्याने केवळ 125 चेंडूंचा सामना केला. यामध्ये त्याने 12 चौकार आणि 5 षटकारांची आतषबाजी केली. कुलदीप यादवने त्याला बाद केलं. फिंचला कर्णधार स्टिव्ह स्मिथने चांगली साथ दिली. स्मिथने 71 चेंडूंत 63 धावांची खेळी केली. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना स्टिव्ह स्मिथ माघारी परतला आणि कांगारूंच्या धावसंख्येला खिळ बसली. पहिल्या दोन सामन्यांत वर्चस्व गाजवाणारे भारतीय गोलंदाज या दोन्ही खेळाडूंपुढे पुरते हतबल दिसले. मात्र त्यानंतर एकाही कांगारू खेळाडूला धावसंख्येला आकार देता आला नाही. भारताकडून बुमराह आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन गडी बाद केले तर चहल आणि पांड्याने प्रत्येकी एका  खेळाडूला तंबूत धाडले. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुरुवातीच्या खेळीत भारतानं ऑस्ट्रेलियाला 293 धावांवरच रोखले होते. ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतला फलंदाज पीटर हँड्सकाँबने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, हँड्सकॉबनं मारलेल्या फटक्यामुळे मैदानावरील प्रेक्षकांना हा चेंडू सीमारेषेपार षटकार जातो असं वाटत असतानाच क्षेत्ररक्षणासाठी उभ्या असलेल्या मनीष पांडेने अतिशय चपळतेनं त्याला झेल बाद केले. त्याचा व्हिडीओ फेसबुकवरील भारतीय संघाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे.