हैदराबाद : बंगालच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्यानं 'तितली' चक्रीवादळानं प्रचंड स्वरूप धारण केलं आहे. तितली चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिनाऱ्यावर येऊन धडकले आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, तितली हे चक्रीवादळ 10 किलोमीटर प्रतितास या वेगानं पुढे सरकले आहे. पूर्व किनारपट्टीवर या वादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे हैदराबाद येथे होणाऱ्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरी कसोटी संकटात येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना यजमान भारताने तिसऱ्या दिवशीच खिशात घातला आणि 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिला कसोटी सामना यजमान भारताने तिसऱ्या दिवशीच एक डाव व 272 धावांनी जिंकला. शुक्रवारपासून मालिकेतील दुसरा आणि अखेरचा सामना हैदराबाद येथे खेळवण्यात येणार आहे. मात्र, तितली वादळामुळे या सामन्यावर पावसाचे सावट निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.