Join us  

IND Vs NZ, 2nd Test: खेळपट्टी वळण घेणारी, चेंडूत उसळीही असेल!, सुनील गावस्कर यांनी वर्तवला अंदाज

IND Vs NZ, 2nd Test: मुंबईत अवकाळी पाऊस बरसत आहे. अपेक्षेप्रमाणे अंधुक प्रकाशही आहे. यामुळे वानखेडेवर दुसरा कसोटी सामना उशिरा सुरू होऊ शकेल. याच कारणास्तव भारत आणि न्यूझीलंड संघ अंतिम एकादश निवडण्यास उशीर लावत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2021 8:04 AM

Open in App

- सुनील गावस्कर

मुंबईत अवकाळी पाऊस बरसत आहे. अपेक्षेप्रमाणे अंधुक प्रकाशही आहे. यामुळे वानखेडेवर दुसरा कसोटी सामना उशिरा सुरू होऊ शकेल. याच कारणास्तव भारत आणि न्यूझीलंड संघ अंतिम एकादश निवडण्यास उशीर लावत आहेत. वानखेडेच्या खेळपट्टीवर लाल माती आहे. याचा अर्थ असा की चेंडू वळण घेईल, शिवाय गोलंदाजांना काही उसळीदेखील मिळेल.  पावसामुळे खेळपट्टीवरील गवत काढण्यास आणि रोलिंग करण्यास क्युरेटरला अधिक वेळ मिळाला नाही. अशा वेळी नाणेफेक होईस्तोवर उभय संघ अंतिम एकादशची घोषणा लांबणीवर टाकू शकतात.भारत दौऱ्यात अनेक संघ बळी घेऊ शकणारे वेगवान गोलंदाज खेळविण्याऐवजी फिरकीपटूंना प्राधान्य देण्याची चूक हमखास करतात. यापैकी अनेक फिरकीपटू परिस्थितीशी एकरूप नसतात. भारतीय फलंदाज त्यांना सहजपणे खेळू शकतात. इंग्लंडच्या २०१२-१३च्या दौऱ्यात  ग्रीम स्वान आणि मोंटी पानेसर यांनी संघाला विजय मिळवून दिला होता. हा एक अपवाद सोडल्यास भारतात जे संघ विजयी झाले ते आपल्या वेगवान गोलंदाजांच्या कामगिरीमुळेच.!

विराट कोहलीच्या पुनरागमनामुळे भारतीय संघात एक बदल निश्चित असेल. ईशांत शर्मा बोटाच्या दुखापतीतून सावरला नसेल तर आणखी एक बदल शक्य होईल. न्यूझीलंड संघात विल समरविले याच्या जागी नील वॅगनर खेळण्याची शक्यता आहे.  समरविले याने नाईटवॉचमनची भूमिका चोखपणे बजावली. पण तो गोलंदाजीत भारतीयांना त्रस्त करू शकला नाही. 

भारतीय संघ मात्र तीन फिरकी गोलंदाजांवर विश्वास दाखविणार. हे तिघेही फलंदाजांपुढे वेगवेगळी आव्हाने उभी करतात. खेळपट्टीपासून उसळी मिळण्याची शक्यता असल्याने कानपूरच्या तुलनेत येथे या गोलंदाजांपुढे खेळणे अधिक आव्हानात्मक असेल. भारतीय संघ फार थोड्या फरकाने पहिल्या सामन्यात विजयापासून वंचित राहिला. वानखेडेवरही असे झाल्यास फार आश्चर्य वाटायला नको ! (टीसीएम)

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडसुनील गावसकर
Open in App