भारत-इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्सच्या मैदानातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळात टीम इंडियाने रिषभ पंतची विकेट नाहक गमावली. जर ही विकेट पडली नसती तर पहिल्या डावात भारतीय संघाला निश्चितच चांगली आणि मॅचला कलाटणी देणारी आघाडी घेता आली असती. पंतच्या विकेटसोबतच टीम इंडियाने ही संधी गमावली. ज्या लोकेश राहुलच्या शतकासाठी पंतनं रिस्क घेतली तो गडीही शंभर धावा करून माघारी फिरला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंत ट्रोल झाला अन् KL राहुलला सेल्फीशचा टॅग
एका बाजूला लंचआधीच्या शेवटच्या षटकात चोरटी धाव घेण्याची गडबड केल्याबद्दल पंत ट्रोल झाला. दुसरीकडे लोकेश राहुललाही नेटकऱ्यांनी सेल्फीशचा टॅग लावला. त्यानंतर आता पंतच्या रन आउटवर लोकेश राहुलनं प्रतिक्रिया दिली आहे. लंच आधी शतक पूर्ण करण्याच्या मोहातच विकेट गमावल्याचे त्याने मान्य केले आहे.
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
पंतच्या रन आउट विकेटवर काय म्हणाला KL राहुल?
पंतच्या रन आउटसंदर्भातील लोकेश राहुल म्हणाला की, काही षटकांपूर्वीच आमच्या दोघांमध्ये चर्चा झाली होती. जर संधी मिळाली तर लंच आधी शतक पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन, असे मी त्याला सांगितले होते. बशीरच्या षटकात ही संधी आहे, असे वाटले अन् एक धाव घेण्याच्या नादात आम्ही विकेट गमावली. पंतनं मला स्ट्राइक देण्यासाठीच ही धाव घेतली. पण हा प्रयत्न फसला अन् आम्ही विकेट गमावली. दोघांसाठीही हा क्षण निराशजनक होता. कारण कोणालाच अशा पद्धतीने विकेट फेकायची नसते, असे म्हणत लोकेश राहुलनं पंतच्या विकेट्समध्ये झालेल्या गडबड घोटाळ्याला स्वत: जबाबदार असल्याचे मान्य केले आहे.
KL राहुलनं शतक ठोकलं, पण...
रिषभ पंतची विकेट गमावल्यावर लंच आधी लोकेश राहुलला शतकाला गवसणी घालता आली नाही. लंचनंतर त्याने शतकाला गवसणी घातली. पण शंभर धावांवरच तो तंबूत परतला. त्याच्याशिवाय पंतनं ७४ धावांचे योगदान दिले. या जोडीनं पाचव्या विकेटसाठी १४१ धावांची खेळी केली होती. जर दोघांनी एका धावेसाठी गडबड केली नसती तर टीम इंडियाने ४०० पेक्षा अधिक धावा आरामात केल्या असत्या. पण ही विकेट गमावल्यावर ठराविंक अंतराने विकेट पडत राहिल्या अन् टीम इंडियाचा पहिला डाव ३८७ धावांवर आटोपला.