Join us

India vs England, 2nd Test : टीम इंडियाचा दे दणका; विजयासाठी हव्यात आता फक्त ७ विकेट्स

India vs England, 2nd Test : आर अश्विनचे ( R Ashwin) खणखणीत शतक अन् विराट कोहलीच्या ( Virat Kohli) अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियानं दुसऱ्या कसोटीत इंग्लंडसमोर ४८२ धावांचे अशक्यप्राय लक्ष्य ठेवले आहे.

By स्वदेश घाणेकर | Updated: February 15, 2021 17:07 IST

Open in App

India vs England, 2nd Test : आर अश्विनचे ( R Ashwin) खणखणीत शतक अन् विराट कोहलीच्या ( Virat Kohli) अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियानं दुसऱ्या कसोटीत इंग्लंडसमोर ४८२ धावांचे अशक्यप्राय लक्ष्य ठेवले आहे. विराट ६२ धावांवर ( १४९ चेंडू व ७ चौकार) माघारी परतला. घरच्या मैदानावर अश्विननं इंग्लंडचा चांगलाच पाहुणचार केला अन् कसोटीतील पाचवे शतक पूर्ण केलं. अश्विन व मोहम्मद सिराज यांनी १०व्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. अश्विन १४८ चेंडूंत १४ चौकार व १ षटकारासह १०६ धावांवर माघारी परतला. भारतानं इंग्लंडसमोर ४८२ धावांचे लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात इंग्लंडचा दुसरा डावही गडगडला. तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचे तीन फलंदाज अवघ्या ५३ धावांवर माघारी परतले होते. ही कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियाला आता फक्त ७ विकेट्स घ्यायच्या आहेत. आर अश्विनकडून इंग्लंडचा पाहुणचार; खणखणीत शतक अन् मोठा पराक्रम!

सकाळच्या सत्रात पुजारा ( ७) पुन्हा विचित्र पद्धतीनं बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर  यष्टीरक्षक बेन फोक्स यानं सुरेख पद्धतीनं रोहित शर्माला  ( २६)  यष्टिचीत करून माघारी पाठवले. बढती मिळालेला रिषभ पंत ( ८), अजिंक्य रहाणे (१०) आणि अक्षर पटेल ( ७) एकामागोमाग माघारी परतले. भारताची अवस्था ६ बाद १०६ अशी झाली होती. आर अश्विन आणि विराट कोहली यांनी दमदार फलंदाजी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांना दमवलं. या दोघांनी सातव्या विकेटसाठी १७७ चेंडूंत ९६ धावांची भागीदारी केली. विराट माघारी परतल्यानंतर अश्विननं जबाबदारीनं खेळ करताना कसोटीतील पाचवे शतक पूर्ण केलं. त्यानं सिराजला सोबत घेताना दहाव्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. भारताचा दुसरा डाव २८६ धावांवर गडगडला.

इंग्लंडनं अखेरच्या सत्रात २० षटकं खेळून काढताना ३ विकेट्स गमावल्या. अक्षर पटेलनं दोन, तर आर अश्विननं एक विकेट घेतली.     

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडआर अश्विनविराट कोहली