Join us  

IND vs AUS: परदेशात सर्वच अपयशी, मग आम्हीच का टार्गेट, रवी शास्त्रींचा संतप्त सवाल

IND vs AUS: भारतीय संघ घरच्या मैदानावरच चांगली कामगिरी करतो, परदेशात त्यांची त्रेधातिरपीट उडते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 3:45 PM

Open in App
ठळक मुद्देऑस्ट्रेलिया दौऱ्याला 21 नोव्हेंबरपासून सुरुवातपरदेशात भारताची कामगिरी तितकी चांगली नाही विराट कोहलीच्या संघाकडून अपेक्षा

ब्रिस्बन : भारतीय संघ घरच्या मैदानावरच चांगली कामगिरी करतो, परदेशात त्यांची त्रेधातिरपीट उडते. त्यामुळे भारतीय संघाला घरच्या मैदानावरील वाघ, असे अनेकदा संबोधले गेले आहे. मात्र, प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय संघाची पाठराखण केली आहे. कोणत्याही संघाला परदेशात साजेशी कामगिरी करता आलेली नाही, अशात भारतीयच संघालाच का टार्गेट केले जात आहे, असा संतप्त सवाल शास्त्री यांनी केला. भारतीय संघ 2018 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. आफ्रिकेत त्यांना 2-1 असा आणि इंग्लंडमध्ये 4-1 असा पराभव पत्करावा लागला. या दोन्ही दौऱ्यावर भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा विराट कोहलीने सांभाळली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाची कामगिरी कशी होईल, याबाबत विचारले असता शास्त्री म्हणाले,''चुकांमधुन शिकायचं असतं. परदेशात फार कमी संघांना चांगली कामगिरी करता आलेली आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांनी अशी कामगिरी केलेली आहे. या दोन संघांव्यतिरिक्त परदेशात कोणत्या संघाला चांगली कामगिरी करता आली आहे का?.. मग भारतीय संघालाच का टार्गेट केलं जातंय.'' आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यातील कामगिरीवर कर्णधार विराट कोहलीने खेळाडूंशी चर्चा केली आहे का, यावर शास्त्री म्हणाले,''त्या दौऱ्यांत आम्हाला बरचं काही शिकायला मिळालं. मिळालेली संधी सोडता कामा नये. आम्ही विजयाच्या जवळ आलो होतो, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. त्यामुळे आम्हाला कसोटी मालिका गमवावी लागली.'' 

टॅग्स :रवी शास्त्रीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहली