Join us  

IND vs AUS 2nd Test : भारताने केवळ 15 षटकांत पराभव पत्करला !

IND vs AUS 2nd Test: भारताच्या पाच फलंदाजांना पाचव्या दिवशी केवळ 15 षटकं खिंड लढवता आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 9:01 AM

Open in App
ठळक मुद्देऑस्ट्रेलियाची मालिकेत 1-1 अशी बरोबरीभारताचा दुसरा डाव 140 धावांवर गडगडलाऑस्ट्रेलियाने 146 धावांनी मिळवला विजय

पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताच्या पाच फलंदाजांना पाचव्या दिवशी केवळ 15 षटकं खिंड लढवता आली. ऑस्ट्रेलियाच्या 287 धावांचा पाठलाग करताना भारताचा निम्मा संघ चौथ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात माघारी परतला होता, अखेरच्या दिवशी उर्वरित पाच फलंदाजही माघारी फिरले. ऑस्ट्रेलियाने भारताचा डाव 140 धावांत संपुष्टात आणताना 146 धावांनी विजय मिळवला. या विजयासह यजमानांनी मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 287 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे 5 फलंदाज 112 धावांवर माघारी परतले होते. पाचव्या दिवशी विजयासाठी भारताला 175 धावा, तर ऑस्ट्रेलियाला 5 विकेट हव्या होत्या. चौथ्या दिवसाच्या उपाहारानंतर भारतीय संघाने वर्चस्व गाजवले होते. 4 बाद 192 धावा अशा मजबूत स्थितीत असलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव 243 धावांवर गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. मोहम्मद शमीने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या होत्या. 

मात्र, 287 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात मिचेल स्टार्कने सलामीवीर लोकेश राहुलला (0) बाद केले. त्यापाठोपाठ चेतेश्वर पुजाराही ( 4) जोश हेझलवुडच्या गोलंदाजीवर माघारी परतला.  कर्णधार विराट कोहली आणि मुरली विजय यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु नॅथन लियॉनने ऑस्ट्रेलियाला मोठे यश मिळवून दिले. त्याने कोहलीला बाद करताना भारताला मोठा धक्का दिला.  उपकर्णधार अजिंक्य रहाणे व हनुमा विहारी यांनी सावध खेळ करताना भारताची खिंड लढवली. दोघांनी भारताच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या, परंतु हेझलवुडने ही भागीदारी संपुष्टात आणली. रहाणेला बाद करताना हेझलवुडने भारताला पराभवाच्या सावटाखाली आणले.  भारताने उर्वरित पाच फलंदाज पाचव्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात माघारी परतले. ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआय