Join us  

India vs Australia : भारतीय खेळाडू आयपीएलमुळे ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजवत आहेत - विराट कोहली

सलग १० ट्वेंटी-२० सामन्यांत टीम इंडिया अपराजित राहिली आहे. या कामगिरीसह टीम इंडियानं सलग ९ ट्वेंटी-२० सामने जिंकण्याचा पाकिस्तानचा विक्रम मोडला. पाकिस्तानने जुलै २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत सलग ९ ट्वेंटी-२० सामने जिंकले होते.

By स्वदेश घाणेकर | Published: December 07, 2020 8:21 AM

Open in App
ठळक मुद्देभारतानं ट्वेंटी-20 मालिकेत घेतलीय २-० अशी विजयी आघाडीऑस्ट्रेलियाचे ५ बाद १९४ धावांचे आव्हान सहा विकेट राखून केले सहज पारशिखर धवनचे अर्धशतक अने विराट कोहली व हार्दिक पांड्याची स्फोटक खेळी

India vs Australia : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं रविवारी आणखी एक पराक्रम केला. वन डे मालिकेतील पराभवानंतर टीम इंडियानं ट्वेंटी-20 मालिकेत दमदार कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या सामन्यात हार मानण्यास भाग पाडले. १९४ धावांचा पाठलाग करताना शिखर धवननं संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर विराटनं सुसाट खेळ केला आणि हार्दिक पांड्यानं ऑसी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. हार्दिकनं पुन्हा एकदा मॅच फिनिशरची भूमिका बजावताना टीम इंडियाला ६ विकेट राखून विजय मिळवून दिला. या विजयाबरोबरच टीम इंडियानं मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

ऑस्ट्रेलियाच्या ४ बाद १९४ धावांच्या प्रत्युत्तरात लोकेश राहुल ( ३०) आणि धवन ( ५२) यांनी टीम इंडियाला सॉलिड सुरुवात करून दिली. राहुल व धवन यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. संजू सॅमसन ( १५) पुन्हा अपयशी ठरला. विजयासाठी ४६ धावांची गरज असताना डॅनिएल सॅम्सनं ऑसींना मोठी विकेट मिळवून दिली. विराट २४ चेंडूंत २ चौकार व २ षटकारासह ४० धावांत माघारी परतला. हार्दिक व श्रेयस अय्यरनं अखेरच्या षटकात फटकेबाजी करून सामन्यासह मालिकाही खिशात घातली. हार्दिक २२ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४२ धावांवर, तर अय्यर ५ चेंडूंत १२ धावांवर नाबाद राहिला. भारतानं ६ विकेट्स राखून हा सामना जिंकला. 

या सामन्यानंतर विराट म्हणाला,'''ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये आम्ही मजबूत टीम प्रमाणे खेळलो. संघात रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे नावाजलेले खेळाडू नव्हते आणि तरीही आम्ही चांगली कामगिरी करून विजय मिळवला, याचा आनंद आहे आणि मला या संघाचा अभिमान आहे.'' हॅमस्ट्रींग इंजरीमुळे रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील ट्वेंटी-२० व वन डे मालिकेचा भाग नव्हता. जसप्रीत बुमराहला कसोटी मालिकेपूर्वी विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

''२०१६ मध्ये हार्दिकला संगात घेण्यामागचं एकच कारण होतं आणि ते म्हणजे त्याची आक्रमक खेळी करण्याची क्षमता. तेव्हा तो शिकत होता आणि आता तो परिपक्व खेळाडू झाला आहे. पुढील ४-५ वर्ष तो संघाला कोणत्याही ठिकाणी विजय मिळवून देऊ शकतो. त्यानं केलेलं नियोजन योग्य होतं आणि ते यशस्वी होताना पाहून आनंदच होतोय,''असे विराट म्हणाला.  

आयपीएलला श्रेय...वन डे मालिकेतील अपयशानंतर ट्वेंटी-20 मालिकेतील पुनरागमनाचे विराटनं कौतुक केलं. त्यानं ट्वेंटी-20तील दमदार खेळीचे श्रेय आयपीएलला दिले. ''प्रत्येकानं आयपीएलमध्ये १४ सामने खेळले. त्यामुळे पुढील प्लान काय याची सर्वांना जाण होती. टी नटराजनचे कौतुक करावे तेवढे कमीच आणि शार्दूल ठाकूरनेही आज चांगली गोलंदाजी केली. हार्दिकनं मॅच फिनिशरची भूमिका बजावली आणि धवनचे निर्णायक अर्धशतक, एकूण हा उत्तम सांघिक खेळ झाला,''असेही विराट म्हणाला.    

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाविराट कोहलीशिखर धवनलोकेश राहुलहार्दिक पांड्यारोहित शर्माजसप्रित बुमराह