Join us  

ICC World Cup 2019 : पावसाचा खेळ चाले... उपांत्य फेरीसाठी प्रयत्नशील असलेल्या संघांना धोका!

ICC World Cup 2019 :  वर्ल्ड कप स्पर्धेत मागील चार दिवसांत पावसामुळे तीन सामने रद्द करण्याची नामुष्की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर ओढावली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 1:11 PM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 :  वर्ल्ड कप स्पर्धेत मागील चार दिवसांत पावसामुळे तीन सामने रद्द करण्याची नामुष्की आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर ओढावली. सोमवारी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. मंगळवारी श्रीलंका आणि बांगलादेश या सामन्यावरही पावसानं पाणी फिरवलं. याआधी 7 जूनला श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामनाही पावसामुळे रद्द करण्यात आला होता. वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात सर्वाधिक सामने रद्द होण्याचा विक्रम यंदा नोंदवला गेला आहे. त्यात आज होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड लढतीवरही पावसाचे सावट आहे. 

हा पाऊस क्रिकेट चाहत्यांना जेवढा त्रासदायक ठरत आहे त्याहून अधिक तो संघांसाठी ठरणार आहे. कारण संघांच्या कामगिरीपेक्षा आता पावसाच्या बॅटिंगवर उपांत्य फेरीचे समीकरण विसंबून राहणार असल्याचे दिसत आहे. आजच्या भारत-न्यूझीलंडच नव्हे, तर रविवारी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यावरही पावसाचं सावट आहे. त्यामुळे मोठ्या संघांनाही पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. अशा परिस्थिती त्यांच्या उपांत्य फेरीचा मार्गही खडतर होऊ शकतो.

आतापर्यंत कोणाला बसला सर्वाधिक फटका श्रीलंका - पावसाने सर्वाधिक नुकसान श्रीलंका संघाला पोहोचवलं आहे. चारपैकी दोन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेश या संघांविरुद्धच्या लढती रद्द झाल्याने श्रीलंकेला एका गुणावर समाधान मानावे लागले. त्यामुळे चार गुणांसह ते गुणतालिकेत सध्या पाचव्या स्थानावर आहेत. उर्वरित पाच सामन्यांतही त्यांना पावसाचा मारा सहन करावा लागणार आहे आणि अशा परिस्थितीत त्यांचे उपांत्य फेरीतील स्थान डळमळीत झाले आहे. त्यामुळे उपांत्य फेरीतील त्यांची शक्यता फार कमीच आहे.

दक्षिण आफ्रिका -  वर्ल्ड कप स्पर्धेत प्रथमच दक्षिण आफ्रिकेला तीन सलग पराभवाचा समाधान मानावा लागला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत त्यांचा प्रवेश अशक्यच दिसत आहे. त्यात वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांना एक गुण मिळाला खरा, परंतु त्याचा त्यांना फार फायदा होईल असे वाटत नाही.

बांगलादेश - तीन गुणांसह बांगलादेश सध्या सातव्या स्थानावर आहे. श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवून त्यांना अव्वल चौघांत प्रवेश करता आला असता, परंतु इंग्लंडमधील लहरी वातावरणाचा त्यांना फटका बसला. दक्षिण आफ्रिकेला नमवून त्यांचा आत्मविश्वास वाढला होता आणि त्यात त्यांनी न्यूझीलंडलाही कडवी झुंज दिली होती. अशा परस्थितीत दुबळ्या श्रीलंकेला नमवणं त्यांना फार अवघड नव्हते. त्यांचेही पाच सामने शिल्लक आहेत, पण उपांत्य फेरीच्या आशाही फार कमीच आहेत. 

पाकिस्तान - पाकिस्तानने यजमान इंग्लंडला नमवून स्पर्धेत अनपेक्षित निकाल नोंदवला, पण श्रीलंकेविरुद्धचा सामना रद्द झाल्याचा त्यांना जबर फटका बसला. त्यांन हक्काचे दोन गुण गमवावे लागले आणि आता ते गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहेत. त्यात रविवारी भारताविरुद्धचा सामनाही पावसामुळे रद्द होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास उपांत्य फेरीचा त्यांचा दरवाजा बंद होईल. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019श्रीलंकापाकिस्तानद. आफ्रिकाबांगलादेश