Join us  

आयसीसी वर्ल्डकप 2019 : भुवनेश्वर कुमारला संघाबाहेर काढायला हवे, सांगत आहेत संजय मांजरेकर

गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भुवनेश्वर कुमारला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे जर कोणत्या खेळाडूला मला संघाबाहेर काढायचे असेल तर तो भुवनेश्वर कुमार असेल, असे मांजरेकर म्हणाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 6:12 PM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारताचा  वर्ल्डकपमध्ये पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेबरोबर होणार आहे. वर्ल्डकपच्या सामन्यांसाठी कोणाला पसंती द्यावी, अशी चर्चा सुरु आहे. पण भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांना स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संघाबाहेर काढायला हवे, असे वाटत आहे.

मांजरेकर म्हणाले की, " हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमार यांच्यामध्ये जर मला कोणाला निवडायचा असेल तर मी हार्दिकला संधी देईन. कारण गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भुवनेश्वर कुमारला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे जर कोणत्या खेळाडूला मला संघाबाहेर काढायचे असेल तर तो भुवनेश्वर कुमार असेल."

स्पर्धेदरम्यान चांगल्या खेळपट्ट्या मिळण्याची आशा - जडेजा

: ‘विश्वचषक स्पर्धेदरम्यान केनिंगटन ओव्हलच्या खेळपट्टीच्या तुलनेत चांगल्या खेळपट्ट्या मिळतील,’ अशी आशा भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने व्यक्त केली. ओव्हलच्या खेळपट्टीवर सराव सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. या लढतीत अर्धशतक झळकावणारा जडेजा एकमेव फलंदाज ठरला. फलंदाजांचे अपयश चिंतेची बाब नसल्याचे जडेजाने सांगितले.सामन्यानंतर जडेजा म्हणाला,‘इंग्लंडच्या सर्वसाधारण परिस्थितीप्रमाणे येथील स्थिती होती. खेळपट्टीमध्ये सुरुवातीला ओलावा होता. काही तासानंतर खेळपट्टी चांगली होत गेली. विश्वकप स्पर्धेत एवढी हिरवळ असलेल्या खेळपट्ट्या मिळणार नाही, अशी आशा आहे. खेळपट्ट्या फलंदाजीसाठी अनुकूल असतील.’ भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा डाव गोलंदाजांसाठी अनुकूल स्थितीमध्ये १७९ धावांत संपुष्टात आला. न्यूझीलंडने सहज लक्ष्य गाठले.जडेजा म्हणाला,‘येथे आमची पहिलीच लढत होती. ही एक लढत होती. एका खराब डावामुळे खेळाडूंचे आकलन करू शकत नाही. त्यामुळे फलंदाजीचा विचार करता चिंतेची बाब नाही. भारतात पाटा खेळपट्ट्यावर खेळण्याचा सराव असल्यामुळे इंग्लंडमध्ये नेहमीच आव्हानात्मक स्थिती असते. यावर तोडगा शोधण्यासाठी आमच्याकडे अद्याप वेळ आहे. चिंतेची कुठली बाब नसून आम्हाला चांगला खेळ करावा लागेल.’ जडेजा पुढे म्हणाला, ‘फलंदाजीचा विचार करता आम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल. संघातील खेळाडू अनुभवी असून चिंतेची बाब नाही.’गोलंदाजीला अनुकूल स्थितीत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. याबाबत जडेजा म्हणाला,‘परिस्थिती वेगवान गोलंदाजांना अनुकूल असल्याची आम्हाला कल्पना होती. त्यामुळे आम्ही खडतर स्थितीत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कारण जर आम्ही अशा स्थितीत खेळण्याचा सराव केला, तर स्पर्धेतील लढतीत खेळणे सोपे होईल. आम्ही आव्हान म्हणून येथे प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आमची कामगिरी उल्लेखनीय ठरेल, यात कुठली शंका नाही.’

 

टॅग्स :भुवनेश्वर कुमारवर्ल्ड कप 2019