कोलकाता : ‘प्रतिकूल परिस्थितीमध्ये गोलंदाजी करण्याची माझी क्षमता मी जाणून आहे. परंतु त्या दिवशी हार्दिकविरुद्ध मी अपेक्षित मारा करू शकलो नाही,’ अशी खंत आॅस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अॅडम झम्पा याने व्यक्त केली.
चेन्नई येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताची ५ बाद ८७ धावा अशी अवस्था असताना हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंह धोनी यांनी ११८ धावांची विजयी भागीदारी केली होती. यादरम्यान डावातील ३७ व्या षटकात अॅडम झम्पाच्या गोलंदाजीवर पांड्याने एक चौकार व ३ षटकारांची आतषबाजी करत भारताच्या धावगतीला निर्णायक वेग दिला.
या महागड्या षटकाबद्दल झम्पा म्हणाला, ‘दबावाच्या क्षणी चांगला मारा करण्याच्या माझ्या क्षमतेवर मला अभिमान आहे. परंतु, त्या सामन्यात माझ्या सर्व योजना अपयशी ठरल्या. हार्दिकला स्ट्राईकपासून दूर ठेवणे महत्त्वाचे होते. मला वाटते, त्या वेळी मी तीन चेंडू त्याच्या बॅटजवळ टाकले आणि त्याचा फटका मला बसला.’ झम्पा म्हणाला, ‘हार्दिकसारख्या फलंदाजाविरुद्ध जर तुम्ही चुकलात, तर चेंडू नक्कीच बाहेर जाणार. तो खूप चांगला खेळाडू आहे.’ (वृत्तसंस्था)
>आॅस्टेÑलियामध्ये गोलंदाजी करताना जर लेंथमध्ये थोडीशी जरी चूक झाली, तरी मैदानाच्या आकारामुळे तुम्ही स्वत: वाचू शकता. पण उपखंडात असे नाही. येथे लेंथ खूप महत्त्वाची आहे. सलग तीन षटकार झेलणे तुम्हाला कधीच आवडणार नाही. पण माझ्या मते असे होत असते. शेन वॉर्नबरोबरदेखील असे झाले आहे. पुढच्या वेळी मी हार्दिकला लवकर बाद करेल, अशी अपेक्षा करतो.
- अॅडम झम्पा