...तरी द्रविडला ते श्रेय लाभले नाही- गौतम गंभीर

४७ वर्षीय द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 07:04 IST2020-06-23T01:25:33+5:302020-06-23T07:04:47+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
However, Dravid did not get that credit - Gautam Gambhir | ...तरी द्रविडला ते श्रेय लाभले नाही- गौतम गंभीर

...तरी द्रविडला ते श्रेय लाभले नाही- गौतम गंभीर

नवी दिल्ली : महान फलंदाज राहुल द्रविड भारतातील सर्वांत कमी श्रेय लाभलेल्या माजी कर्णधारांपैकी एक आहे, असे मत भारताचा माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने व्यक्त केले. गंभीर म्हणाला, ‘द्रविडचे योगदान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरप्रमाणे आहे, पण त्याला पुरेसे श्रेय मिळाले नाही. द्रविडने भारतातर्फे ७९ वन-डे सामन्यांत नेतृत्व केले आणि त्यात संघाने ४२ सामन्यांत विजय मिळवला. त्यात सलग १४ सामने जिंकण्याच्या विक्रमाचाही समावेश आहे. ४७ वर्षीय द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केली.
स्टार स्पोर्ट््सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’मध्ये बोलताना गंभीर म्हणाला, ‘राहुल द्रविडला आपण त्याच्या नेतृत्वाचे श्रेय देत नाही, हे दुर्दैव आहे. आपण केवळ सौरव गांगुली, एम.एस. धोनीबाबत चर्चा करतो. आता आपण विराट कोहलीबाबत बोलतो, पण राहुल द्रविड भारतासाठी एक शानदार कर्णधार होता.’
भारतातर्फे १६४ कसोटी सामन्यांत १३,२८८ धावा आणि ३४४ वन-डेमध्ये १०,८८९ धावा फटकावणाऱ्या या शानदार फलंदाजाबाबत बोलताना गंभीर म्हणाला, ‘द्रविडचे रेकॉर्ड शानदार आहेत, पण क्रिकेटपटू म्हणून त्याच्या योगदानाची योग्य दखल घेण्यात आलेली नाही आणि कर्णधार म्हणून कदाचित सर्वांत कमी श्रेय मिळालेला कर्णधार ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंड, वेस्ट इंडिजमध्ये विजय मिळवला. आम्ही सलग १४ किंवा १५ सामन्यांत विजय मिळविण्यात यशस्वी ठरलो होतो.’
द्रविड २०१६ ते २०१९ या कालावधीत भारताच्या अंडर-१९ व ‘अ’ संघाचे मुख्य प्रशिक्षक होते आणि आता द्रविड बेंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये क्रिके ट संचालनचे संचालक आहेत.
शानदार फलंदाजाव्यरिक्त द्रविड चांगला क्षेत्ररक्षक व यष्टिरक्षकही होता. त्याने यष्टिरक्षक म्हणून १९९९ ते २००४ पर्यंत ७३ सामन्यांत ८५ बळी घेतले. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये बिगर यष्टिरक्षक क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक झेल टिपण्याचा विश्वविक्रमही नोंदवला. त्याने १६४ सामन्यात २१० झेल टिपले. (वृत्तसंस्था)
>‘भारतीय क्रिकेटवर द्रविडचा प्रभाव तेंडुलकर व गांगुलीपेक्षा अधिक आहे. सौरवने नेहमी आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर वन-डे क्रिकेटमध्ये छाप सोडली, पण भारतीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविडचा प्रभाव अन्य खेळाडूंच्या तुलनेत अधिक आहे. खरे सांगायचे झाल्यास तुम्ही सचिन तेंडुलकरसारख्या कुणा खेळाडूसोबत त्याच्या प्रभावाची तुलना करू शकता. द्रविडची संपूर्ण कारकीर्द सचिन तेंडुलकरमुळे झाकोळली गेली, पण प्रभाव कदाचित तेवढाच राहिला.’
- गौतम गंभीर

Web Title: However, Dravid did not get that credit - Gautam Gambhir