Join us  

‘तळाच्या फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची आशा’

भारताला आता पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवावा लागेल,’ अशी प्रतिक्रिया भारताचे सहायक प्रशिक्षक संजय बांगर यांनी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 1:46 AM

Open in App

अ‍ॅडलेड : ‘मालिकेतील उर्वरित सामन्यांत भारतीय संघाला तळाच्या फलंदाजांकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे. यात सुधारणा होणे आवश्यक आहे. भारताला आता पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवावा लागेल,’ अशी प्रतिक्रिया भारताचे सहायक प्रशिक्षक संजय बांगर यांनी दिली.भारताने पहिल्या कसोटी अखेरचे ७ बळी ७३ धावांमध्ये, तर अखेरचे पाच बळी २५ धावांत गमावल्या. या सामन्यामध्ये पाहुण्या भारतीय संघाचा दुसरा डाव ३०७ धावांत संपुष्टात आला. ‘मला तळाच्या फलंदाजांकडून आणखी २५ धावांचे योगदान अपेक्षित होते,’ असेही फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर म्हणाले.बांगर यांनी पुढे सांगितले की, ‘फलंदाजीच्या विभागात आम्ही सातत्याने सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहोत. नवव्या, दहाव्या व अकराव्या क्रमांकावरील फलंदाज आजच्या तुलनेत भविष्यामध्ये चांगली कामगिरी करतील अशी आशा आहे. रुषभ पंत फलंदाजीला आला त्यावेळी संघाची धावसंख्या २६० च्या आसपास होती. यावेळी पंत याने संघावरील दडपण झुगारत झटपट ३०-३५ धावांची भर घातली. त्यानंतर आम्हाला चांगली रणनीती आखण्याची संधी होती, पण तळाचे फलंदाज ढेपाळले आणि मोठी धावसंख्या गाठण्यात आम्हाला यश आले नाही.’ फलंदाजी प्रशिक्षक बांगर यांनी यावेळी चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांच्या चिवट खेळाचीही प्रशंसा केली.अ‍ॅडलेडमध्येही यशस्वी ठरू शकतो - लियोनदोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानविरुद्ध अनिर्णीत राखलेल्या लढतीपासून प्रेरणा घेत सोमवारी भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आॅस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लियोनने म्हटले आहे. पाचव्या दिवशी अ‍ॅडलेड ओव्हलची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल राहील आणि यजमान संघ ३२३ धावांचे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करेल, असे लियोनने म्हटले.लियोनने भारताच्या दुसऱ्या डावात १२२ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. लियोन म्हणाला,‘माझ्या मते खेळपट्टी थोडी वेगवान झाली असून वेगवान गोलंदाजांना विशेष अनुकूल नाही. खेळपट्टी फिरकीला अनुकूल असून भारतीय संघात जागतिक दर्जाचा फिरकीपटू आहे. त्यामुळे आमच्या फलंदाजांसाठी आव्हान राहणार आहे.’ऑक्टोबर महिन्यात खेळल्या गेलेल्या कसोटीत पाकिस्तानविरुद्ध उस्मान ख्वाजाने १४१ धावांची सामना वाचविणारी खेळी केली होती. तसेच, कर्णधार टीम पेन याने नाबाद ६१ धावा करीत चांगले योगदान दिले होते. सोमवारी याची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास लियोनने व्यक्त केला. लियोन म्हणाला,‘आम्ही दुबईतील लढतीबाबत चर्चा केली. आम्ही ही लढत जिंकू शकतो, असे आम्हाला वाटते. हा सर्वोत्तम विजय ठरेल. पहिल्या सत्रात सर्वकाही स्पष्ट होईल.’

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया