Join us  

एक-दोन सामने खेळवून डावलल्यावर सातत्य कसे राखणार? उमेश यादव निवड समितीवर बरसला

आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघात जलद माऱ्याची जबाबदारी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व भुवनेश्वर कुमार यांच्या खांद्यावर असणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2019 3:59 PM

Open in App

नवी दिल्ली, आयपीएल 2019 : आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघात जलद माऱ्याची जबाबदारी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व भुवनेश्वर कुमार यांच्या खांद्यावर असणार आहे. इंग्लंडच्या वातावरणात भारतीय संघात आणखी एक जलदगती गोलंदाज हवा होता असे मत अनेकांनी व्यक्त करताना उमेश यादवचे नाव सुचवले होते. पण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा गोलंदाज उमेशला आयपीएल स्पर्धेत अपयश आले. या अपयशाला निवड समिती जबाबदार असल्याची अप्रत्यक्ष टीका उमेशने केली आहे. भारतीय संघात निवड केल्यानंतर 1-2 सामने खेळवून डावलले जात असल्यामुळे आत्मविश्वास गमावल्याचे उमेशने सांगितले आणि त्यामुळेच कामगिरीवर परिणाम झाल्याचा दावा त्याने केला.

''माझी कामगिरी चांगली होत नसल्याचे प्रत्येक जण चर्चा करतो आणि असे का होतेय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या दोन वर्षांत मी स्थानिक क्रिकेटमध्ये सर्व फॉरमॅटमध्ये खेळलो, परंतु त्याहीनंतर मला फार कमी वन डे व ट्वेंटी-20 सामने खेळण्याची संधी मिळाली. 1-2 सामन्यांसाठी भारतीय संघात माझी निवड केली जायची आणि त्यानंतर पुन्हा बसवले जायचे. मी सर्वोत्तम योगदान देत नसल्याचे सर्वांना वाटू लागते, परंतु हा मुद्दा नाहीच आहे. असे प्रत्येक जलदगती गोलंदाजासोबत घडत आहे,''असे उमेशने सांगितले.

24 ऑक्टोबरला अखेरचा वन डे सामना खेळणारा उमेश पुढे म्हणाला,''मागील सहा महिन्यांपासून मला सातत्य राखण्यातही अपयश येत आहे. काही वेळेला बऱ्याच गोष्टी तुमच्या डोक्यात सुरू असतात. त्याचा आत्मविश्वासावर नक्कीच परिणाम होतो. यंदाच्या आयपीएलमध्ये मला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. गतसत्रात मी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होतो. त्यामुळे यंदाच्या कामगिरीमुळे मी नक्की हताश झालो आहे.''

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील 'रॉयल' लढतीवर पावसाने पाणी फिरवलं. प्ले ऑफचे आव्हान कायम राखण्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात दोन्ही संघांना 1-1 गुणावर समाधान मानावे लागले. या सामन्यात निकाल लागावा याकरिता 5-5 षटकांची मॅचही खेळवण्यात आली, परंतु पावसाच्या दमदार बॅटिंगने सामना अखेरीस रद्द करावा लागला. यामुळे बंगळुरूच्या प्ले ऑफच्या आशा अखेरीस संपुष्टात आल्या, तर राजस्थान 11 गुणांसह पाचव्या स्थानी पोहोचले आहेत. त्यांचेही प्ले ऑफचे आव्हान जर तरच्या समीकरणावर अवलंबून आहे.

टॅग्स :आयपीएल 2019रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर्ल्ड कप २०१९