Join us  

Good Bye 2019 : या वर्षात भारताच्या गोलंदाजांनी केला मोठा पराक्रम, ऐकाल तर विश्वास बसणार नाही

या वर्षात भारताच्या गोलंदाजांनी असा एक पराक्रम केला आहे, जो ऐकल्यावर तुम्हालाही विश्वास बसणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 2:30 PM

Open in App

मुंबई : भारतीय संघासाठी २०१९ हे वर्ष चांगले गेले. या सर्वातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भारताच्या गोलंदाजांनी यशामध्ये मोठा वाटा उचलला. या वर्षात भारताच्या गोलंदाजांनी असा एक पराक्रम केला आहे, जो ऐकल्यावर तुम्हालाही विश्वास बसणार नाही.

भारतीय संघ हा फलंदाजीसाठी आतापर्यंत ओळखला जायचा. भारताने चांगले गोलंदाज दिले, पण एकाच वेळी सर्व चांगले गोलंदाज संघात नव्हते. त्याचबरोबर त्यांना सातत्यही राखता आले नव्हते. परदेशातील उसळत्या आणि वेगवान खेळपट्ट्यांवर भारतीय गोलंदाजीची धार बोथट झाल्याचे यापूर्वी पाहायला मिळाले. पण सध्याच्या घडीला भारताच्या गोलंदाजांचा ताफा चांगलाच मजबूत असल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर भारतीय गोलंदाजांचे विविध पर्याय भारताकडे उपलब्ध असल्याचेही पाहायला मिळाले.

भारताच्या गोलंदाजांनी या वर्षात एक वेगळाच पराक्रम केला आहे. भारताच्या गोलंदाजांनी या वर्षात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये हॅट्ट्रिक घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने हॅट्ट्रिक घेतली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये शमीबरोबर कुलदीप यादवनेही हॅट्ट्रिक घेतल्याचे पाहायला मिळाले. कसोटी क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहने आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये दीपक चहरने हॅट्ट्रिक घेतल्याचे पाहायला मिळाले. 

भारतीय क्रिकेट संघासाठी २०१९ हे भारतीय संघ जबरदस्तच राहीले होते. पण या वर्षातील फक्त ३० मिनिटांनी मात्र भारतीय संघाचा घात केला. गेल्या वर्षातील या ३० मिनिटांमुळे भारतीय संघाला जोरदार टीकाही सहन करावी लागली होती.

भारतीय संघाने २०१९ या वर्षात ५२ सामने खेळले. या ५२  सामन्यांमध्ये ३५ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला. या वर्षात भारताने सात कसोटी, १६ एकदिवसीय आणि ९ ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये विजय मिळवला. त्याचबरोबर या वर्षभरात १४ मालिका भारतीय संघाने खेळल्या. या १४ मालिकांपैकी भारताने १० मालिका जिंकल्या, तर दोन मालिकांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आणि एक मालिका अनिर्णित राहिली. या गोष्टी पाहून भारताला हे वर्ष कसे गेले,हे तुम्ही समजू शकता. पण फक्त त्या ३० मिनिटांमुळे भारतीय संघाने साऱ्यांना निराश केले.

ही ३० मिनिटे नेमकी कोणती, याचा विचार आता तुम्ही करत असाल. या वर्षी इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती. या स्पर्धेत भारताची चांगली कामगिरी राहीली. या विश्वचषकातील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. भारताला उपांत्य फेरीत न्यूझीलंडने पराभूत केले आणि त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.

न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातील पहिल्या ३० मिनिटांमध्येच भारताने पराभव पत्करल्याचे पाहायला मिळाले. कारण या पहिल्या ३० मिनिटांमध्ये भारताने फॉर्मात असलेल्या रोहित शर्माला गमावले होते. त्याचबरोबर कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुलहेदेखील बाद झाले. भारतीय संघ या धक्क्यातून सावरू शकला नाही आणि त्यांचा पराभव झाला.

भारताने पहिल्या ३० मिनिटांमध्ये आपले तीन फलंदाज गमावले. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी भारताची खिंड लढवण्याचा प्रयत्न केला. पण अखेर भारताला पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर भारताच्या संघावर आणि संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका झाली. पण फक्त ही गोष्ट वगळता भारताने यंदाच्या वर्षात चांगली कामगिरी केली, हे निश्चितच आपण म्हणू शकतो.

टॅग्स :जसप्रित बुमराहमोहम्मद शामीकुलदीप यादव