प्रसाद लाड, मुंबई : सध्याच्या घडीला क्रिकेट वर्तुळामध्ये एक चर्चा सर्वात जोरात सुरु आहे आणि ती गोष्ट म्हणजे महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची. गुरुवारी धोनी निवृत्त होणार अशा अफवा उठल्या होत्या. पण धोनी नेमकी निवृत्ती कधी जाहीर करणार याबाबत भाष्य भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने एका खास मुलाखतीमध्ये सांगितले आहे. 'लोकमत डॉट कॉम'ला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये बुमराने धोनी आणि कोहली यांच्या नेतृत्वाबद्दलही भाष्य केले आहे.
धोनी कर्णधार असताना बुमराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आता संघाचे कर्णधारपद हे कोहलीच्या नावावर आहे. त्यामुळे या दोन्ही कर्णधारांबरोबर बुमरा खेळला आहे. या दोघांच्या नेतृत्वाबाबत बुमरा म्हणाला की, " मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, धोनीच्या नेतृत्वाखाली मला भारताकडून खेळण्याची पहिली संधी मिळाली. धोनी आणि कोहली यांच्या नेतृत्वामध्ये फार फरक आहे. धोनी हा एक शांत व्यक्ती आहे आणि त्याच्यामधील संयतपणा नेतृत्व करताना दिसतो. तो नेहमीच युवा खेळाडूंना मार्गदर्शन करतो. दुसरीकडे कोहली आपल्या कामगिरीच्या माध्यमातून संघापुढे आदर्श निर्माण करतो. त्याचबरोबर प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास उंचावण्यामध्ये तो मदत करतो. कोहली हा गोलंदाजांना मोकळीक देतो. कधीच त्यांच्यावर दडपण टाकण्याचा किंवा काही गोष्टी करण्यासाठी दडपण आणत नाही. ही त्याची गोष्ट माल फार भावते."
धोनीच्या निवृत्तीबाबत विचारले असता बुमरा म्हणाला की, " धोनी हा एक दिग्गज क्रिकेटपटू आहे. विश्वचषक जिंकत त्याने बऱ्याच भारतीयांचे स्वप्न साकार केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मला संधी मिळाली, म्हणून माझ्यासाठी नेहमीच तो खास कर्णधार असेल. त्याचे नेतृत्व मी कधीही विसरू शकणार नाही. आता एवढ्या मोठ्या खेळाडूच्या निवृत्तीबाबत मी काय सांगणार? धोनी हा निर्णय घेण्यासाठी सक्षम आहे. तो उचित वेळ आल्यावर आपल्या निवृत्तीचा निर्णय नक्कीच घेईल. "
घरातून विरोध असूनही बुमरा बनला टॉप बॉलर; जाणून घ्या रहस्यतुमच्याकडे गुणवत्ता, चिकाटी आणि अथक मेहनत घेण्याची त्रिसूत्री असली की, तुमचे स्वप्न तुम्ही सत्यात उतरवू शकता. लहानपणी त्यानेही एक स्वप्न पाहिले. क्रिकेटपटू होण्याचे. घरातून त्याला विरोध झाला. कारण वडिल व्यावसायिक होते. आई शिक्षिका. घरात यापूर्वी कुणी मोठ्या स्तरावर क्रिकेट खेळलं नव्हतं. त्यामुळे क्रिकेटमध्ये तुझं कसं होणार? असा प्रश्न विचारत त्याला विरोध केला गेला. पण त्याने आपले हे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतला होता. तो प्रामाणिकपणे खेळत गेला आणि यशाची एकामागून एक पायरी चढत गेला. सध्याच्या घडीला तो क्रिकेट विश्वातला सर्वोत्तम वेगवान गोलंदाज ठरला आहे. ही कहाणी आहे भारताचा युवा वेगवान गोलंदाज आणि 'यॉर्कर मास्टर' ही बिरुदावली मिरवणाऱ्या जसप्रीत बुमराची.
आपल्या या साऱ्या गोष्टींचा उलगडा बुमराने यावेळी केला. आपल्या स्ट्रगलबद्दल बुमरा म्हणाला की, "लहान असताना माझ्या घरातून क्रिकेटला विरोध होता. भरपूर जणं क्रिकेट खेळतात. त्यामध्ये जास्त स्पर्धा असते. त्यामुळे क्रिकेटमध्ये कसं चांगलं करीअर होऊ शकतं? मला मोठ्या स्तरावर क्रिकेट खेळायला मिळेल किंवा नाही, अशी माझ्या आईला भिती होती. त्यामुळे तिचा क्रिकेटला विरोध होता. पण विरोध म्हणजे क्रिकेट खेळायचंच नाही, असं आईचं म्हणणं नव्हतं. आपण जे काही करतोय, त्यामध्ये जर अपयशी ठरलो, तर पुढे काय करायचं, हा बॅकअप प्लॅनही तुमच्याकडे असायला हवा, असं आईचं म्हणणं होतं. क्रिकेट हे माझं स्वप्न होतं. तुम्ही स्वप्न बघायला शिकायला हवं, पण त्याचबरोबर तुम्ही सर्वोत्तम कामगिरी करत ते सत्यात उतरवणं सर्वात महत्वाचं असतं."
जसप्रीतच्या वडिलांचे तो सात वर्षांचा असताना निधन झाले. त्याचे बाबा व्यावसायिक होते. त्यामुळे त्यांच्यानंतर तु घरच्या व्यवसायाकडे का वळाला नाहीस, असे विचारल्यावर बुमरा म्हणाला की, "व्यवसाय करायचा की नाही, हा मी कधीच विचार केला नाही. कारण माझं पहिलं प्रेम हे क्रिकेट होतं. मी टीव्हीवर क्रिकेट पाहायचो. टेनिस बॉलने खेळायचो. आणि हेच स्वप्न मला जगायचं होतं. त्यामुळे मी कधीही क्रिकेट माझ्यापासून वेगळं केलं नाही. मेहनत घेत गेलो आणि प्रत्येकवेळी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या साऱ्या गोष्टींमुळे मला यश मिळत गेलं."
यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो...आता मला सारे विचारतात की, तुझ्या यशाचे रहस्य काय? मी त्यांना फक्त एवढंच सांगू इच्छितो की, तुम्ही यशाच्या मागे धावत राहीलात तर ते तुम्हाला मिळणार नाही. यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. प्रत्येक गोष्टीची प्रोसेस असते, त्यामधून तुम्हाला जावेच लागते. जोपर्यंत ही प्रोसेस कमी होत नाही, तोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही. यश मिळाल्यावरही ते कसं टिकून ठेवायचं, यामध्ये सर्वात जास्त कसब लागतं, असं बुमरा म्हणाला.