- हर्षा भोगले लिहितात...
आयपीएल सुरू झाले तेव्हा सनराइजर्स हैदराबादसाठी वॉर्नरची अनुपस्थिती मेस्सीच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरणाऱ्या बार्सिलोनासारखी होईल, का अशी भीती वाटत होती. वॉर्नर हा केवळ चांगला फलंदाज नव्हे तर उत्कृष्ट कर्णधार असल्याने माझी भीती योग्य असावी. अशावेळी केन विलियम्सनला नेतृत्व सोपवित सनराइजर्सने चांगले काम केले. कठीण समयी विश्वसनीय व्यक्तीवर सर्वकाही सोपविणे चांगलेच असते.
शिखर धवन हा फलंदाजीची भिस्त सांभाळताना दिसत आहे. भुवनेश्वर कुमारच्या अनुपस्थितीत संदीप शर्मासह अनेक खेळाडू आपापली जबाबदारी ओळखून वागत आहेत. लिलावाच्यावेळी योग्यता असलेले खेळाडू निवडण्याचा हैदराबादने पर्याय ठेवला. उदाहरणार्थ, सिद्धार्थ कौल अनुपस्थित असेल तर खलिल अहमद आणि बासील थम्पी हे त्याचे पर्याय ठरू शकतात.
आयपीएल लांबलचक स्पर्धा असली तरी राशीद खानचे गोलंदाजीतील प्रदर्शन आणि दीपक हुड्डाची संयमी फलंदाजी पाहिल्यानंतर हैदराबादच्या गोटात आनंद संचारला असावा.
मुंबई इंडियन्स मुसंडी मारून स्पर्धेत परत येईल, यात शंका नाही, त्यासाठी रोहित शर्मा याला ‘मॅचविनिंग’ खेळी करावीच लागेल. माझ्या मते रोहित पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेण्याच्या विचारात असतो. पण असे करण्यासाठी मुंबईकडे ईशान किशन व एव्हिन लुईस आहेत. रोहित हा मर्यादित षटकांच्या सामन्यात फार सहजपणे मोठ्या धावा काढू शकतो. मुंबईसाठी हार्दिकचे पुनरागमन फार आवश्यक आहे. त्याच्या गोलंदाजीची संघाला गरज आहे. मुंबईची सुरुवात मंद झाली. पण हा संघ लवकरच वर्चस्व गाजवेल असे वाटते. (टीसीएम)