Join us  

ICC WOMENS U19 T20 WORLD CUP 2023: थरारक सामन्यात ऑस्ट्रेलियाची हार; रविवारी भारत-इंग्लंड यांच्यात रंगणार फायनल

India vs England final: भारतीय महिलांनी न्यूझीलंडचा पराभव करून विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला. तर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून फायनलचे तिकिट मिळवले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 8:49 PM

Open in App

नवी दिल्ली : सध्या दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर अंडर-19 महिला विश्वचषकाचा थरार रंगला आहे. भारतीय महिलांनी न्यूझीलंडच्या संघाला मात देऊन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शेफाली वर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने उपांत्य फेरीत 8 गडी राखून किवी संघाला पराभवाची धूळ चारली. या विजयासह भारताने अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताने 108 धावांच्या आव्हानाचा सहज पाठलाग पूर्ण केला आणि फायनलचे तिकिट मिळवले. उपांत्य फेरीतील दुसरा सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला. दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. त्यामुळे रविवारी भारत विरूद्ध इंग्लंड असा फायनलचा सामना होणार आहे. 

इंग्लंडने मिळवला विजय19 वर्षांखालील मुलींच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने 100 धावांचा यशस्वी बचाव केला. ऑस्ट्रेलियाला त्यांनी 96 धावांवर गुंडाळले अन् फायनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भारत-इंग्लंड अशी फायनल होणार आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 20 षटकांत सर्व 10 गडी गमावून 99 धावा केल्या. संघाकडून लेक्सा स्टोनहाउसने (25) सर्वाधिक धावा केल्या. 100 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाला 18.4 षटकांत सर्व 10 गडी गमावून केवळ 96 धावा करता आल्या. कांगारूच्या संघाकडून एमी स्मिथने सर्वाधिक 26 धावा केल्या. इंग्लंडकडून हॅना बेकरने सर्वाधिक 3 बळी घेऊन संघाला फायनलचे तिकिट मिळवून दिले.

भारताचा फायनलमध्ये प्रवेश उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव केला. न्यूझीलंडने दिलेल्या 108 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने शानदार सुरूवात केली. मात्र, कर्णधार शेफाली वर्मा (10) स्वस्तात परतली. भारताला चौथ्या षटकांत 33 धावसंख्या असताना पहिला झटका बसला. त्यानंतर श्वेता सेहरावत आणि सौम्या तिवारी यांनी सावध खेळी करून धावसंख्या पुढे नेली. भारताची उपकर्णधार श्वेता सेहरावतने (61) अर्धशतकी खेळी करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. तिने 39 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. सौम्या तिवारी सावध खेळी करून श्वेताला साथ देत होती मात्र ती (22) धावांवर अन्ना ब्रोनिंग हिची शिकार झाली आणि भारताला दुसरा झटका बसला. 

दरम्यान, श्वेता सेहरावतच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने फायनलचे तिकिट मिळवले. श्वेता सेहरावत आणि सौम्या तिवारी यांच्या 62 धावांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे भारताला सहज विजय मिळवता आला. न्यूझीलंडकडून अन्ना ब्रोनिंग (2) व्यतिरिक्त कोणत्याच गोलंदाजाला बळी घेण्यात यश आले नाही. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२महिलाभारतीय महिला क्रिकेट संघ
Open in App