कराची : पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (पीसीबी) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) तब्बल ७ करोड डॉलरच्या नुकसान भरपाई रक्कमेची मागणी केली आहे. विविध कारणांमुळे प्रस्तावित भारत - पाकिस्तान द्विपक्षीय क्रिकेट मालिका होऊ न शकल्याने निराश झालेल्या पीसीबीने ही मागणी केली आहे. या प्रकरणी पीसीबीने चर्चात्मक प्रक्रीया पूर्ण केल्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली. काही दिवसांमध्ये पीसीबी आयसीसीच्या समितीकडे आपला दावा सादर करेल.
याविषयी पीसीबी अध्यक्ष नजम सेठी यांनी सांगितले की, ‘आम्ही बीसीसीआयसह २०१४ साली संमती पत्रावर स्वाक्षरी केली होती. यानुसार दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळविण्यात येणार होती. यामध्ये आमच्या यजमानपदाखाली पाकिस्तानात आयोजित मालिकेचाही समावेश होता. भारताने या निर्णयाचा अवलंब केला नाही. तसेच, त्यांनी २००८ सालापासून कोणतीही मालिका खेळलेली नाही. पण, आयसीसी स्पर्धांमध्ये मात्र त्यांना आमच्याविरुध्द खेळण्यात कोणतीही अडचण येत नाही.’
या संमती पत्रानुसार दोन्ही देशांना २०१५ ते २०१२ पर्यंत सहा द्विपक्षीय मालिका खेळायच्या होत्या, असेही सेठी यांनी यावेळी सांगितले. (वृत्तसंस्था)
पाकिस्तानला भारतासह द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळण्यास कोणतीही अडचण नव्हती. मात्र, बीसीसीआयने संघ न पाठवण्याचा निर्णय घेतल्याने पीसीबीला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले, अशा शब्दांत नजम सेठी यांनी नाराजी व्यक्त केली.