नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. पण, त्या सामन्यात दिनेश कार्तिकने ती एक धाव घेण्यास नकार दिला नसता तर कदाचित भारतीय संघ जिंकला असता. कार्तिकच्या त्या निर्णयावर नेटिझन्सने चांगलीच टीका केली, परंतु आपण असे का केलं, हे कार्तिकने गुरुवारी सांगितले.
न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेल्या 213 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला 6 बाद 208 धावांपर्यंतच मजल मारता आली. या सामन्यात भारताला विजयासाठी 16 धावांची गरज होती. न्यूझीलंडला वेगवान गोलंदाज टिम साऊथी हा अखेरचे षटक टाकण्यासाठी सज्ज झाला होता. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कार्तिकने दोन धावा घेतल्या. या षटकातील दुसरा चेंडू साऊथीने वाईट टाकला, पण पंचांनी हा वाईड बॉल दिला नाही आणि भारतावरील दडपण अजून वाढले.
तिसऱ्या चेंडूवर कार्तिकने लाँग ऑनला एक फटका मारला. हा फटका मारल्यावर कृणाल पंड्या धाव घेण्यासाठी धावत गेला. पण कार्तिकने त्याला माघारी धाडले. यावेळी धोनीसारखा विचार कार्तिक करत असल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर तीन चेंडूंमध्ये भारताला 14 धावांची गरज होती. कृणालही चांगली फटकेबाजी करत होता. त्यामुळे कृणालला जर एक धाव घेऊन फटकेबाजी करण्याची संधी कार्तिकने दिली असती तर कदाचित भारतीय संघ हा सामना जिंकूही शकला असता.
त्यावर कार्तिक म्हणाला,''6 बाद 145 धावा अशा परिस्थितीत असताना मी आणि कृणाल पांड्यानं चांगली फलंदाजी केली. या सामन्यात आम्ही कमबॅक केले आणि किवी गोलंदाजांवर दडपण निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो. हा सामना जिंकू असा विश्वास आम्हाला होता आणि ती एक धाव घेण्यास नकार दिल्यानंतरही मी षटकार खेचून हा सामना जिंकू शकतो, असा मला विश्वास होता.''
Web Title: Dinesh Karthik explains his decision to not take a single off the final over in 3rd T20I against New Zealand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.