Join us  

वर्ल्ड कपसाठी चौथ्या क्रमांकावर हवा 'हा' फलंदाज, सांगत आहेत दिलीप वेंगसरकर

समस्येवर भारताचे माजी निवड समिती अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी एक सल्ला दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 10:00 PM

Open in App

मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : : भारतीय संघ वर्ल्ड कपसाठी सज्ज झाला आहे. पण सध्याच्या घडीला वर्ल्ड कपमधील फक्त एकच चिंता सतावत आहे आणि ती म्हणजे चौथ्या क्रमांकावर कोणत्या फलंदाजाला संधी द्यायची. या समस्येवर भारताचे माजी निवड समिती अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी एक सल्ला दिला आहे.

वेंगसरकर म्हणतात, " भारतीय संघ समतोल आहे. त्यामुळे भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीतपर्यंत पोहोचेल. त्यानंतर संघाला प्रतिस्पर्धी संघांकडून कडवी लढत मिळू शकते. सध्याच्या घडीला चौथ्या क्रमांकावर कोणत्या फलंदाजाला पाठवायचे, हा भारतीय संघापुढे पेच असावा. रोहित शर्मा आणि शिखर धवन हे सलामीला येतील, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहली येईल. पण त्यानंतर चौथ्या क्रमांकासाठी लोकेश राहुलला संधी द्यायला हवी. कारण तोच एक चांगलाच पर्याय दिसत आहे. कारण इंग्लंडमध्ये खेळण्याचा राहुलला चांगलाच अनुभव आहे. हा अनुभव नक्कीच त्याच्या कामाला येईल."

आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत उतरणारा भारतीय संघ हा सर्वोत्तम असल्याचे मत अनेक माजी खेळाडूंनी व्यक्त केले आहे. त्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने गेल्यी दीड वर्षांत परदेशातही धडाकेबाज कामगिरी केली आहे. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघच जेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याची जोरदार चर्चा आहे. पण, भारतीय संघात एक स्थान असे आहे, ज्यावर कोणाची दावेदारी असेल हे अद्याप निश्चित झालेले नाही. चौथ्या क्रमांकासाठी भारताने गेल्या दोन वर्षांत अनेक पर्यायांची चाचपणी केली, परंतु त्यांना सक्षम उमेदवार सापडलेला नाही. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने या क्रमाकांसाठी एक सक्षम पर्याय सुचवला आहे. 

वर्ल्ड कपसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात चौथ्या क्रमांकासाठी विराट कोहली, दिनेश कार्तिक, विजय शंकर, केदार जाधव आणि लोकेश राहुल यांच्या नावाची चर्चा आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गरज पडल्यास कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येईल, असे संकेत दिले होते. पण, त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. पण, गंभीरने या क्रमांकासाठी राहुलला खेळवण्याचा सल्ला दिला आहे. 

तो म्हणाला,"चौथ्या क्रमांकासाठी भारतीय संघाकडे दोन क्वालिटी प्लेअर आहेत. दिनेश कार्तिक आणि राहुल... अंबाती रायुडूला बरीच संधी मिळाली, परंतु वर्ल्ड कप संघात त्याला स्थान देण्यात आलेले नाही. चौथा क्रमांक हा खूप महत्त्वाचा आहे. इंग्लंडच्या खेळपट्टीच्या लहरीपणा पाहता सलामीवीर लवकर बाद झाल्यास सर्व भार चौथ्या क्रमांकावर येतो. लोकेश राहुल हा चौथ्या क्रमांकासाठी परफेक्ट आहे. चिकाटी आणि तंत्रशुद्ध फलंदाजी हा त्याचा प्लस पॉईंट आहे. दिनेश कार्तिक सहाव्या क्रमांकासाठी परफेक्ट." 

विराट कोहलीला सल्ला...भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गरज पडल्यास विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर खेळवण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे मत व्यक्त केले होते. त्यावर गंभीरने नाराजी प्रकट केली. कोहलीने तिसऱ्या क्रमंकावर खेळावे. फलंदाजीचा क्रम बदलून खेळावर परिणाम करून घेऊ नये. चौथ्या क्रमांकासाठी लोकेश राहुल हा सक्षम पर्याय आहे, असा सल्ला त्याने दिला.

टॅग्स :वर्ल्ड कप २०१९लोकेश राहुलविराट कोहली