एबी डिव्हिलियर्स लिहितो...एक जुनी म्हण आहे. आजारी गोल्फरपासून सावधान! जो गोल्फर चांगले वाटत नाही, असे म्हणून मैदानात उतरतो. त्या वेळी त्याच्यावर दडपण, ताण आणि अपेक्षांचे ओझे नसते. अशावेळी तो उत्कृष्ट कामगिरी करतो. मी हे यासाठी सांगतो की आरसीबी आयपीएलमधील आजारी गोल्फर आहे.आमचा संघ भक्कम असून काही वेळा आम्ही शानदार खेळ केला. पण मोक्याच्या क्षणी फलंदाजी आणि गोलंदाजीत माघारलो. दहापैकी केवळ तीनच सामने जिंकल्याने आयपीएलबाहेर पडण्याच्या स्थितीत आहोत. तरीही आमच्यासाठी सर्व काही संपलेले नाही.दिल्ली, पंजाब, हैदराबाद आणि राजस्थानविरुद्ध चारही सामने जिंकावे लागतील, यात शंका नाही. चारही सामने आम्ही जिंकू शकतो का हा प्रश्न आहे. होय असे करू शकतो. टी-२० तर चुकांना माफी नसते. विजयासाठी मोक्याच्या क्षणी खेळाचा स्तर सुधारावा लागेल.विजयाची सवय लावावी लागेल आणि लय निर्माण करावी लागणार आहे. संघाच्या समर्पित वृत्तीत कुठलीही उणीव नाही. पराभवाचे खापर कुणीही कुणावर फोडलेले नाही. संघाची अशी अवस्था होण्यास आम्ही सर्वजण जबाबदार आहोत. आता सर्वांनी मिळून परिस्थितीवर विजय मिळवावा लागेल.आयुष्यातील अन्य पैलूंसारखीच खेळातही परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा त्यावर तोडगा काढण्याचे दोन मार्ग असतात. एकतर सर्वांनी मिळून डॅमेज कंट्रोल करावे आणि कुणावरही आरोप-प्रत्यारोप होणार नाहीत याची काळजी घ्यायची. दुसरे म्हणजे एकमेकांची साथ न सोडता भक्कम पाठिंबा देणे. आरसीबीने दुसरा मार्ग निवडला हे पाहून फार बरे वाटले. चाहत्यांना आम्ही निराश केल्याची जाणीव आहेच. पण आम्हाला प्ले आॅफची संधी आहे हे देखील जाणतो. कुणालाही लोळवू शकतो यावर आमचा विश्वास आहे.दिल्लीत या आठवड्यात आमची चांगली तयारी झाली. विराट कोहलीने सर्व सहकाऱ्यांना स्वत:च्या नुएवा या हॉटेलमध्ये पार्टी दिली. ती एक रम्य सायंकाळ ठरली. नुएवा हा स्पॅनिश शब्द असून त्याचा अर्थ ‘नवा’ असा आहे. आमच्याकडेही हेच शस्त्र आहे. नवी आशा...!
- Cricket Buzz»
- बातम्या»
- महत्त्वाच्या क्षणी खेळाचा स्तर सुधारावा लागेल
महत्त्वाच्या क्षणी खेळाचा स्तर सुधारावा लागेल
एक जुनी म्हण आहे. आजारी गोल्फरपासून सावधान! जो गोल्फर चांगले वाटत नाही, असे म्हणून मैदानात उतरतो.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 06:57 IST