- हर्षा भोगले लिहितात...
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेहमी दोन पद्धती असतात. दोन्ही एकमेकांपेक्षा भिन्न आहेत. एकतर चाहते पसंत करतात तसा आवश्यक रनरेट कायम राखावा किंवा मग जितके स्थिरावून खेळता येईल तसे खेळावे. अर्थात ‘धोनी स्कूल आॅॅफ चेसिंग’सारखे दोन्ही सामन्यात चेन्नईने विजयाचे धोनी मॉडेल वापरले. या दरम्यान चाहत्यांमध्ये अखेरपर्यंत रोमांच होता आणि शेवटही विजयाने झाला.
धोनी मॉडेलमुळे अखेरपर्यंत जोखिम पत्करुन सामना खेचला जाऊ शकतो. गोलंदाजांवर दडपण आणणे शक्य होते शिवाय सामन्याचे पारडे कुणाकडेही झुकू शकते. एकंदरीत गणित सोपे आहे. अखेरच्या टप्प्यातील फलंदाजी ही डेथ ओव्हरमधील गोलंदाजीच्या तुलनेत सोपी होते. दुसरे असे की टी-२० त कुठलेही लक्ष्य अवघड नाही. मुंबईत चेन्नईची नौका ब्राव्होने काठावर आणली तर चेन्नईत सॅम बिलिंग्स हिरो ठरला.
मी अलीकडे जितक्या खेळाडूंसोबत बोललो त्यापैकी अनेकांचे मत असे की विकेट हातात असणे महत्त्वाचे आहे. धावगती राखता आली नाही तरी विकेट हातात असायला हव्यात. ५० षटकांचा सामना पारंपरिकदृष्ट्या असाच खेळला जातो. टी-२० त काहींच्या मते २० षटकात तुमच्याकडे दहा गडी असतात. त्यामुळे सुरुवातीपासून अखेरपर्यंत धडाकाच करायला हवा. २०१४ मध्ये जॉर्ज बेलीच्या नेतृत्वात किंग्स इलेव्हन पंजाबने हेच डावपेच यशस्वीरीत्या राबविले होते.
चेन्नईत आंद्रे रसेलच्या बळावर केकेआरने अखेरच्या पाच षटकांत ७९ धावा कुटल्या. दुसरीकडे चेन्नईनेही अखेरच्या सात षटकात ९१ धावा वसूल करीत लक्ष्य गाठले. एकूणच विजयाचा धोनी पॅटर्न आकारास येत आहे. येत्या काही दिवसात हा ट्रेंड आणखी लोकप्रिय होतो का, हे पाहणे रंजक ठरणार आहे. (टीसीएम)