Join us  

तामिळनाडूवर ‘पृथ्वी’चा शतकी हल्ला, चौथ्या प्रथम श्रेणी सामन्यात झळकावले तिसरे शतक  

१७ वर्षीय युवा फलंदाज पृथ्वी शॉ याने झळकावलेल्या शानदार शतकाच्या जोरावर बलाढ्य मुंबईने रणजी चषक स्पर्धेत तामिळनाडूविरुध्द पहिल्या दिवसअखेर ७ बाद ३१४ धावांची मजल मारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 10:14 PM

Open in App

मुंबई : १७ वर्षीय युवा फलंदाज पृथ्वी शॉ याने झळकावलेल्या शानदार शतकाच्या जोरावर बलाढ्य मुंबईने रणजी चषक स्पर्धेत तामिळनाडूविरुध्द पहिल्या दिवसअखेर ७ बाद ३१४ धावांची मजल मारली. पृथ्वीने पुन्हा एकदा स्वत:ला सिध्द करताना आपल्या चौथ्या प्रथम श्रेणी सामन्यात तिसºयांदा शतकी तडाखा देत सर्वांचे लक्ष वेधले. काही दिवसांपूर्वीच ज्यूनिअर आशिया चषक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या १९ वर्षांखालील भारतीय संघात पृथ्वीची निवड करण्यात आली नव्हती. पृथ्वीचे स्थान वेगळे असून सध्या त्याने रणजी क्रिकेटसाठी खेळावे, असे सांगत निवडकर्त्यांनी युवा संघासाठी पृथ्वीला डावलले. परंतु, या गोष्टीचा आपल्या कामगिरीवर कोणताही परिणाम होऊ न देता पृथ्वीने पुन्हा एकदा प्रथम श्रेणी शतक झळकावत स्वत:ला सिध्द केले. विशेष म्हणजे काही आठवड्यांपूर्वीच झालेल्या दुलीप चषक स्पर्धेतही पृथ्वीने पदार्पण करताना शतक झळकावल्यानंतर न्यूझीलंडसारख्या कसलेल्या संघाविरुद्ध अनौपचारीक सामन्यात भारतीय अध्यक्षीय एकादश संघाकडूनही पृथ्वीने आपली छाप पाडली होती. पृथ्वीने हीच लय कायम राखताना मुंबईसाठी मोलाचे योगदान दिले. पृथ्वीने रविचंद्रन आश्विनसारख्या अव्वल गोलंदाजांचा समावेश असलेल्या तामिळनाडूविरुद्ध १५५ चेंडूत १७ चौकार आणि २ षटकारांसह १२३ धावांची शानदार खेळी केली. याशिवाय संघात पुनरागमन झालेला हुकमी फलंदाज श्रेयस अय्यरनेही ६२ चेंडूत ७ चौकार व २ षटकारांसह ५७ धावांची उपयुक्त खेळी केली. या दोघांनी दुसºया विकेटसाठी ९८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.त्याचबरोबर पहिल्या सामन्यात मध्य प्रदेशविरुध्द वैयक्तिक कारणामुळे खेळू न शकलेल्या कर्णधार आदित्य तरेनेही १२३ चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह ५३ धावांची खेळी केली. मात्र, या तिघांव्यतिरिक्त अखिल हेरवाडकर (०), सूर्यकुमार यादव (३९) आणि सिध्देश लाड (१८) अपयशी ठरल्याने मुंबईची धावसंख्या मर्यादित राहिली. दिवसअखेर अभिषेक नायर २० धावांवर नाबाद होता. तामिळनाडूकडून विजय शंकरने ३ बळी घेत मुंबईच्या धावसंख्येला वेसण घातले. तसेच यो महेश आणि रविचंद्रन आश्विन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.  धावफलक मुंबई (पहिला डाव) ८९.१ षटकात ७ बाद ३१४ धावा (पृथ्वी शॉ १२३, श्रेयस अय्यर ५७, आदित्य तरे ५३; विजय शंकर ३/३७, योमहेश २/५८, रविचंद्रन आश्विन २/७७)

टॅग्स :क्रिकेटमुंबई