मुंबई : बिहारचा 32 वर्षीय गोलंदाज आशुतोष अमन याने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एका सत्रात सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम करताना भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांचा विक्रम मोडला. अमनने रणजी करंडक स्पर्धेच्या प्लेट गटातील आठ सामन्यांत 65 विकेट घेतल्या. या कामगिरीसह त्याने 44 वर्षांपासून बेदी यांच्या नावावर असलेला विक्रम मोडला. बेदी यांनी 1974-75 च्या हंगामात 64 विकेट घेतल्या होत्या.
प्लेट गटात बिहारने 8 सामन्यांत सहा विजय मिळवत 40 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. अमन प्रथमच रणजी करंडक स्पर्धेत खेळत असून त्याने सात प्रथम श्रेणी सामन्यांत हा पराक्रम केला. त्याने सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि नागालँड या संघांविरुद्ध दहा विकेट घेण्याचा विक्रमही केला.
गोलंदाजीतच नव्हे तर त्याने फलंदाजीतही आपली चुणूक दाखवली. त्याने सिक्कीमविरुद्ध 89 आणि मिझोरामविरुद्ध 111 धावांची खेळी केली. त्याचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिलेच शतक ठरले.