Join us  

BREAKING: बीसीसीआयमध्ये मेगाभरती; मुख्य प्रशिक्षकासह महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज

वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय संघात बदलाचे वारे वाहत आहेत. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह साहाय्यक प्रशिक्षकांचा कार्यकाळ वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंतच होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 2:32 PM

Open in App

मुंबई : वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर भारतीय संघात बदलाचे वारे वाहत आहेत. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह साहाय्यक प्रशिक्षकांचा कार्यकाळ वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंतच होता. परंतु, त्यांना आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आल्यानंतर त्यांच्या करारात वाढ न करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. त्यामुळेच बीसीसीआयनं मुख्य प्रशिक्षकासह, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक, फिजिओथेरेपिस्ट, तंदुरुस्ती प्रशिक्षक आणि प्रशासकीय व्यवस्थापक या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी 30 जुलै 2019, सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करायचे आहेत. रवी शास्त्री यांना पुन्हा करावा लागणार अर्जभारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासह सहयोगी स्टाफच्या नेमणुकीसाठी बीसीसीआयने नव्याने अर्ज मागविले आहेत. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही नव्याने अर्ज करावा लागेल. पुढील महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर जाईल. यानंतर 57 वर्षीय शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा करार संपणार आहे. गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरूण, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर व क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांचाही करार संपणार आहे. भारतीय संघ 3 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या काळात विंडीज दौऱ्यावर जाईल. यादरम्यान मुख्य प्रशिक्षक तसेच सहयोगी स्टाफ निवडण्याची प्रक्रिया पूर्ण होणे शक्य नसल्याने शास्त्री व कंपनीचा कार्यकाळ 45 दिवसांसाठी वाढविण्यात आला.

वरील सर्व जण पुन्हा अर्ज करू शकतात. शंकर बासू व पॅट्रिक फरहार्ट यांनी पद सोडल्यामुळे ट्रेनर व फिजिओ या पदांवर नवी नेमणूक होईल. विंडीज दौºयानंतर भारतीय संघ घरच्या मैदानावर द. आफ्रिकेविरूद्ध खेळेल. याआधी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना पद सोडावे लागल्यानंतर 2017 मध्ये शास्त्री यांच्याकडे सुत्रे आली. त्यापूर्वी ऑगस्ट 2014 ते 2016 या काळात शास्त्री हे भारतीय संघाचे संचालक होते. त्यांच्या कार्यकाळात भारताने आयसीसीची एकही मोठी स्पर्धा जिंकली नाही. मात्र, यंदा भारताने त्यांच्या मार्गदर्शनात आॅस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता.

टॅग्स :बीसीसीआयरवी शास्त्रीवर्ल्ड कप 2019