Join us  

अश्विन भारताचा सर्वश्रेष्ठ गोलंदाज- सकलेन मुश्ताक

कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी ठरलेला गोलंदाज मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही यशस्वी ठरतो, असेही तो म्हणाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 3:25 AM

Open in App

नवी दिल्ली : स्वत:ला सिद्ध करणारा रविचंद्रन अश्विनसारख्या खेळाडूला भारताच्या मर्यादित षटकांच्या संघातून बाहेर का ठेवण्यात आले, हे न उलगडणारे कोडे असल्याचे पाकिस्तानाचा माजी फिरकीपटू सकलेन मुश्ताकने म्हटले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी ठरलेला गोलंदाज मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही यशस्वी ठरतो, असेही तो म्हणाला.आयपीएलमध्ये नियमित खेळणाऱ्या अश्विनला जुलै २०१७ नंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघात स्थान मिळाले नाही. रवींद्र जडेजासोबतही हेच घडले होते. पण तो आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळत आहे.क्रिकेटमध्ये ‘दुसरा’ चेंडूची सुरुवात करणारा हा माजी दिग्गज म्हणाला,‘क्षमता स्थायी असते, मग तुम्ही बोटाने फिरकी गोलंदाजी करा किंवा मनगटाने करा. तुमची क्षमता खेळाची स्थिती ओळखण्यात महत्त्वाची ठरते. अश्विनला वन-डे क्रिकेटमध्ये स्थान मिळत नसल्यामुळे मला आश्चर्य वाटले. ज्या गोलंदाजांना कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजाला कसे बाद करायचे हे माहित असते, त्या गोलंदाजासाठी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये हे काम सोपे होते. धावा रोखण्याचे काम कुणीही करू शकेल, पण जो बळी घेण्यास सक्षम असतो तो धावाही रोखू शकतो. अश्विनला दोन्ही बाबी येतात. तुम्ही त्याला संघाबाहेर कसे ठेवू शकता? आपण आपल्या सर्वश्रेष्ठ खेळाडूचे समर्थन करायला हवे.’ भारतीय निवड समितीने २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर संघात मनगटाच्या जोरावर फिरकी गोलंदाजी करणारे कुलदीप यादव व युजवेंद्र चहल यांना संधी दिली. दोघांनीही मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्धही केले. पण २०१९ विश्वकप स्पर्धेनंतर एकत्र अंतिम ११ खेळाडूत स्थान मिळविण्यात यशस्वी ठरले नाही. कसोटीमध्ये मायदेशात अश्विन भारताचा अव्वल फिरकीपटू आहे. पण विदेशात खेळल्या जाणाºया कसोटीमध्ये तो अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे.सकलेन म्हणाला,‘भारताने हरभजनच्या स्थानी अश्विनला संधी दिली. अश्विनसोबत अनेक आॅफ स्पिनरला संधी मिळाली, पण एकही त्याच्या दर्जाचा नव्हता. हरभजनला संघातून वगळण्यात आले होते त्यावेळीही मला आश्चर्य वाटले होते. अश्विन व हरभजन यांची गोलंदाजीची शैली वेगळी आहे. दोघेही एकत्र अंतिम ११ मध्ये खेळू शकले असते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :आर अश्विन