कोलकाता : अनुस्तुप मजुमदारने नाबाद शतकी खेळी करीत बंगालला शनिवारी स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या कर्नाटकविरुद्ध रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीच्या लढतीत पहिल्या दिवसअखेर पहिल्या डावात ९ बाद २७५ धावांची मजल मारून दिली.
आघाडीची फळी अपयशी ठरल्यानंतर मजुमदारने एकाकी झुंज देत आतापर्यंत १७३ चेंडूंना सामोरे जाताना १८ चौकार व एका षटकाराच्या मदतीने नाबाद १२० धावा केल्या आहेत. त्याने उपांत्यपूर्व फेरीतही कारकिर्दीतील सर्वोत्तम १५७ धावांची खेळी केली होती.
१३ वर्षांनंतर अंतिम फेरी गाठण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या बंगालला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. पहिल्या दिवशी स्थानिक क्रिकेटमध्ये डीआरएसमुळे (अंपायर समीक्षा प्रणाली) पहिली विकेटही गेली. अभिमन्यू मिथुन (६५ धावांत ३ बळी) याने डावातील १६ व्या चेंडूवर अभिषेक रमनला (०) बाद केले. भारतात स्थानिक क्रिकेटमध्ये प्रथमच डीआरएसचा वापर रणजी स्पर्धेच्या दोन्ही उपांत्य लढतीत करण्यात येत आहे; पण त्यात हॉकआय, स्निकोमीटर व अल्ट्राएज नाही.
बंगालची कामगिरी ओडिशाविरुद्धच्या सामन्याप्रमाणे झाली. त्यात त्यांनी ५ बाद ४६ अशी अवस्था असताना पुनरागमन केले होते. कर्णधार अभिमन्यू ईश्वरन (१५) व मनोज तिवारी (०८) चुकीचा फटका खेळून बाद झाले. त्यामुळे त्यांची ४ बाद ६२ अशी अवस्था झाली होती.