कराची : पाकिस्तानचा अनुभवी लेगस्पिनर सईद अजमल याने गुरुवारी जड अंत:करणाने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तथापि जाता-जाता या गोलंदाजाने सदोष शैलीचे विश्लेषण करणा-या आयसीसीच्या कारभारावर सडकून टीका केली. आयसीसीपुढे पाकने आपली बाजू भक्कमपणे मांडली नाही, असेही तो म्हणाला.
यशस्वी पण वादग्रस्त करिअरमध्ये अजमलने ३५ कसोटीत १७८ गडी बाद केले आहेत. २०१४ ला तो लंकेविरुद्ध अखेरची कसोटी खेळला. याच सामन्यात गोलंदाजीतील सदोष शैलीबद्दल दुसºयांदा तक्रार झाली होती. २००९ मध्ये यूएईत आॅस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्याबद्दल पहिल्यांदा तक्रार झाली होती.
अजमल म्हणाला,‘मी निवृत्त होत आहे. नव्या खेळाडूंना संधी द्यायला हवी. आपल्याच संघावर ओझे बनू इच्छित नाही. सन्मान गमवायचा नाही. मी जड अंत:करणाने खेळाला निरोप देत आहे. आयसीसीचा प्रोटोकॉल कठोर आहे. पाकने माझी बाजू भक्कमपणे मांडली नाही, याची खंत वाटते.’
सचिनबाबत गूढ कायमच...
२०११ च्या विश्वचषक उपांत्य सामन्यात सचिनला माझ्या चेंडूवर पंचांनी नाबाद ठरविले. त्या घटनेला पाच वर्षे उलटली. पण माझ्यासाठी अद्यापही हे कोडे असल्याचे अजमलने म्हटले. सचिनने त्या सामन्यात ८५ धावा ठोकल्या होत्या. त्या सामन्यात सचिनविरुद्धचे पायचितचे अपील पंचांनी फेटाळले होते.