कोलंबो : ‘मी अपयशी ठरल्याचे मानण्यात मला कोणताही कमीपणा वाटत नाही, मात्र मी कमीत कमी २०१९ सालापर्यंत आशा सोडणार नाही,’ अशी प्रतिक्रिया सध्या भारतीय संघाबाहेर असलेला स्टार अष्टपैलू युवराज सिंग याने दिली.
२०११ साली भारताला विश्वचषक मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावलेल्या युवराजला गेल्या काहीवर्षांपासून राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यास संघर्ष करावा लागत आहे. युवराजने म्हटले की, ‘मी सांगू इच्छितो की, मी अपयशी ठरलो. मी अजूनही अपयशी आहे. मी कमीत कमी तीन तंदुरुस्ती चाचणीमध्ये अपयशी ठरलो, पण रविवारी मी तंदुरुस्ती चाचणी यशस्वी केली. १७ वर्षांनंतर मी आजही अपयशी ठरत आहे.’
युनिसेफ या स्वयंसेवी संस्थेच्या एका कार्यक्रमामध्ये उपस्थिती राहिलेल्या युवराजने आपल्या कारकिर्दीविषयी कोणताही निर्णय स्वत: घेणार असल्याचेही सांगितले. युवराजने म्हटले की, ‘मी अपयशाला घाबरत नाही. मी चढ-उतार पाहिले आहेत. मी पराभव पाहिला असून हा यशाचा पाया आहे. एक यशस्वी व्यक्ती बनण्यासाठी आधी अपयशी होणे गरजेचे असते. मी मेहनत करत असून, हे कदाचित पहिल्यापेक्षा अधिक खडतर असेल. कारण माझे वय वाढत आहे. माझ्या मते मी २०१९ सालापर्यंत आणखी खेळू शकेल आणि त्यानंतरच माझ्या कारकिर्दीविषयी निर्णय घेईल.’