ठळक मुद्देलोकेश राहुल, रवींद्र जडेजाच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाच्या ७ बाद १६१ धावादुखापतग्रस्त जडेजाच्या जागी मैदानावर आलेल्या युजवेंद्र चहलनं घेतल्या तीन विकेट्सट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या टी नटराजननं दाखवला इंगा
India vs Australia, 1st T20I : लोकेश राहुलनं ( KL Rahul) ट्वेंटी-20 क्रिकेटमधील फॉर्म कायम राखताना अर्धशतकी खेळ केली आणि रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja) अखेरच्या षटकात फटकेबाजी करून टीम इंडियाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. पण, दुखापतीमुळे तो क्षेत्ररक्षणाला येऊ शकला नाही. मात्र, त्याच्या बदल्यात मैदानावर आलेल्या युजवेंद्र चहलनं ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. चहलच्या धक्क्यांनी ऑस्ट्रेलियाला सावरू दिले नाही आणि भारतानं पहिल्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. टी नटराजननेही उल्लेखनीय कामगिरी केली.
प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला साजेशी सुरुवात करता आली नाही. शिखर धवन ( १) आणि विराट कोहली ( ९) स्वस्तात माघारी परतले. संजू सॅमसन १५ चेंडूंत २३ धावा करून माघारी परतला. वन डे मालिकेत बाकावरच बसलेल्या मनीष पांडेला आज संधी मिळाली, परंतु तो अवघे दोन धावा करून माघारी परतला. लोकेश ४० चेंडूंत ५ चौकार व १ षटकार मारून ५१ धावांवर माघारी परतला. हार्दिकनं काही अफलातून फटके मारले, परंतु त्याला १६ धावांवर माघारी जावं लागलं. मोइजेस हेन्रीक्सनं ४-०-२२-३ अशी कामगिरी केली. जडेजानं २३ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह नाबाद ४४ धावा केल्या, टीम इंडियानं ७ बाद १६१ धावा केल्या.
अॅरोन फिंच आणि डी'आर्सी शॉर्ट यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करून दिली. दीपक चहरनं टाकलेल्या ७ व्या षटकात सलग दोन चेंडूंवर दोन झेल सुटले, मनीष पांडे व विराट कोहली यांच्याकडून हे जीवदान मिळाले. पण, दुखापतग्रस्त जडेजाच्या जागी मैदानावर आलेल्या युजवेंद्र चहलनं त्याच्या पहिल्याच षटकात ऑसींना धक्का दिला. हार्दिक पांड्यानं अफलातून झेल घेत ३५ धावा करणाऱ्या फिंचला माघारी जाण्यास भाग पाडले. चहलनं पुढच्याच षटकात स्टीव्हन स्मिथला बाद केले. ग्लेन मॅक्सवेलला पायचीत करून टी नटराजननं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमधील पहिली विकेट घेतली. मोइजेस हेन्रीक्स आणि शॉर्ट यांनी संयमी खेळ करताना ऑस्ट्रेलियाच्या आशा कायम राखल्या होत्या, परंतु नटराजननं ३४ धावांवर असलेल्या शॉर्टला बाद केले.
युजवेंद्र चहलनं ४ षटकांत २५ धावांत ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्यानंतर दीपक चहरनं ऑस्ट्रेलियाचा अखेरचा आशास्थान हेन्रीक्सला ( ३०) बाद केले. टीम इंडियानं हा सामना ११ धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाला ७ बाद १५० धावा करता आल्या. नटराजननं ३० धावांत ३ विकेट्स घेतल्या.