India vs Australia, 3rd Test : मोहम्मद शमी व उमेश यादव यांची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेतल्याचे अखेर BCCIनं शुक्रवारी जाहीर केलं. पहिल्या कसोटीत शमी, तर दुसऱ्या कसोटीत उमेश दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर दोघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेणार असल्याची चर्चा रंगली आणि तशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या. पण, BCCIकडून याबाबत कोणतेच अधिकृत वृत्त आले नव्हते. अखेरीस शुक्रवारी त्यांनी घोषणा केली. याचबरोबर रोहित शर्मा ( Rohit Sharma) उर्वरित कसोटींसाठी मैदानावर उतरला आहे. त्यामुळे उर्वरित कसोटींमध्ये अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) किंवा रोहित यापैकी कोण नेतृत्व सांभाळणार याची चर्चा सुरू झाली आहे. BCCIनं तेही स्पष्ट केलं.
अॅडलेड कसोटीत पॅट कमिन्सनं टाकलेला चेंडू शमीच्या हातावर जोरात आदळला आणि वेदनेसह त्यानं मैदान सोडले. शमीला पुन्हा तंदुरुस्त होण्यासाठी सहा आठवडे लागतील आणि त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याचे खेळणे अनिश्चित आहे. हातावरील प्लास्टर काढल्यानंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होईल, असे बीसीसीआयनं स्पष्ट केलं होतं. त्यात दुसऱ्या कसोटीत उमेशला दुखापत झाली अन् त्यालाही माघार घ्यावी लागली आहे. या दोघांच्या जागी टी नटराजन ( T Natarajan) आणि शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) यांना स्थान देण्यात आले आहे. ( T Natarajan to replace Umesh Yadav in India’s Test squad )
१६ डिसेंबरला सिडनी येथे आलेल्या रोहितनं १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण केला आणि आता तो तिसऱ्या कसोटीसाठी मैदानावर उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. बुधवारी हिटमॅन मेलबर्नला दाखल झाला आणि त्यानं सहकाऱ्यांची गळाभेट घेतली. इंडियन प्रीमिअर लीगच्या १३व्या पर्वात
रोहित शर्माला दुखापत झाली होती. त्यामुळे रोहितला मुंबई इंडियन्सच्या काही सामन्यांना मुकावे लागले होते. UAE तून भारताचा ३२ सदस्यीय ताफा ऑस्ट्रेलियाला रवाना झाला, परंतु रोहित वैयक्तिक कारणास्तव मायदेशात परतला. तेथून तो पुनर्वसनासाठी बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला. तेथून तंदुरुस्ती चाचणी पास करून तो ऑस्ट्रेलियात दाखल झाला.
उर्वरित दोन कसोटींमध्ये
अजिंक्य रहाणेकडेच नेतृत्व
रोहित शर्मा टीम इंडियाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर नेतृत्वाची जबाबदारी कोण सांभाळेल अशी चर्चा सुरू झाली आहे. पण, बीसीसीआयनं स्पष्ट केलं की, अजिंक्यच दोन्ही कसोटींत नेतृत्व करणार आहे. रोहितकडे उप कर्णधाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
असा असेल संघ - अजिंक्य रहाणे ( कर्णधार) , रोहित शर्मा ( उप कर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान सहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, टी नटराजन.