
India vs Australia, 3rd Test : आता तरी पुजारा, पंत, अश्विन यांचं संघातील महत्त्व सर्वांना कळलं असेल- सौरव गांगुली
India vs Australia, 3rd Test : रिषभ पंतची ( Rishabh Pant) फटकेबाजी, चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara), हनुमा विहारी ( Hanuma Vihari) व आर अश्विन ( R Ashwin) यांची संयमी खेळी यामुळे सिडनी कसोटी सर्वांच्या चांगलीच लक्षात राहील. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांच्या असभ्य वर्तणुकीनं गाजली. पण, टीम इंडियानं दुखापतग्रस्त खेळाडूंसह हा सामना अनिर्णीत राखला. या ऐतिहासिक कामगिरीनंतर सर्वांनी टीम इंडियाचं कौतुक केलं. भारताचा माजी कर्णधार व BCCI अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) यानं रिषभ, पुजारा आणि अश्विन यांच्या संघातील महत्त्व आतातरी लोकांना कळले असेल, असा सवाल केला.
रोहित शर्मानं ९८ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५२ धावांची खेळी केली. शुबमन गिल ३१ धावांवर, तर अजिंक्य रहाणे ४ धावांवर बाद झाले. पुजारानं २०५ चेंडूंत १२ चौकारांसह ७७ धावा केल्या. रिषभ पंतनं ११८ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह ९७ धावा चोपल्या. विहारी-अश्विननं २५९ चेंडूंत ६२ धावांची नाबाद भागीदारी करून सामना अनिर्णीत राखला. विहारी १६१ चेंडूंत २३, तर अश्विन १२८ चेंडूंत ३९ धावांवर नाबाद राहिला. अश्विननं फक्त फलंदाजीतच नव्हे, तर शाब्दिक सडेतोड उत्तर देऊनही ऑस्ट्रेलियाची बोलती बंद केली. मालिका अजूनही १-१ अशी बरोबरीतच आहे आणि १५ जानेवारीपासून चौथा व अखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे होणार आहे.
सौरव गांगुलीनं ट्विट केलं की,''आता तरी सर्वांना चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत व आर अश्विन यांचे संघातील महत्त्व समजले असेल. सर्वोत्तम गोलंदाजांची फौज असणाऱ्या संघाविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणे सोपं नक्कीच नाही. त्यांनी जवळपास ४०० विकेट्स अशाच घेतलेल्या नाहीत. भारतीय संघानं चांगली लढत दिली. आता मालिका विजयाची वेळ आलीय.''
Hope all of us realise the importance of pujara,pant and Ashwin in cricket teams..batting at 3 in test cricket against quality bowling is not always hitting through the line ..almost 400 test wickets don't come just like that..well fought india..time to win the series @bcci
— Sourav Ganguly (@SGanguly99) January 11, 2021