५० वर्षे जुन्या वीज तारा केव्हा बदलणार ? महावितरणचा ग्रामीण भागाकडे कानाडोळा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 17:34 IST2025-08-11T17:31:31+5:302025-08-11T17:34:47+5:30
सत्तरच्या दशकातील तारा आजही वापरात : ग्रामीण भागाची वीजेवर चाललेली तगमग!

When will the 50-year-old electricity wires be replaced? Mahavitaran is turning a blind eye to rural areas!
लोकमत न्यूज नेटवर्क
पळसगाव (पि) : गेल्या साठ-सत्तरीच्या दशकापासून ग्रामीण भागातील अनेक गावांत विजेचे आगमन होऊन दिव्यांचा झगमगाट झाला असला, तरी वीज वाहून नेणाऱ्या खांबावरील अल्युमिनिअमच्या तारा नव्याने पुनर्जीवित न झाल्यामुळे त्या शेवटची घटका मोजत ग्राहकांसाठी समस्यांचे माहेरघर बनल्या आहेत.
आज या तारांचीच वाट लागलेली असल्याने तार तुटणे, व्होल्टेज कमी होणे, वेळोवेळी फॉल्ट होणे, दिवसासातून दहा वेळा लाइन जाणे आदी समस्यांनी हाच विभाग त्रस्त झाला आहे. काही गावागावांत वीज चोरीवर आळा बसावा याकरिता केबल टाकल्या गेले आहे. आपल्याकडील शेतातील विद्युत तारा मात्र आहे, त्या अवस्थेत शेवटची घटका मोजत आहेत. शहरी भागात या जुन्या तारांचे नूतनीकरण झाले. मात्र, ग्रामीण भागात साठ सत्तरच्या दशकातील अल्युमिनिअमच्या ताराच कायम आहेत.
तांब्याच्या तारा लागल्याच नाही
शहरी भागात मात्र तांब्याच्या ताराचा वापर केला गेला आहे. अल्युमिनिअमऐवजी तांब्याची तार वीज वहनासाठी सुरक्षित व दीर्घकाळ टिकणारी असताना शहरी भागात या जुन्या तारांचे नूतनीकरण झाले. मात्र, ग्रामीण भागात साठ-सत्तरच्या दशकातील ज्या अल्युमिनिअमच्या तारा आहेत, त्यावरच कारभार सुरू आहे.
लोंबकळणाऱ्या तारांना बांबूचा आधार
अनेक वर्षांपासून या तारातून वीज वहन होत असल्याने या जीर्ण तारा अनेक ठिकाणी लांबल्या आहेत. त्यामुळे तारांना तारा चिकटत असल्यामुळे फॉल्ट होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह घरगुती ग्राहकांना दोन्ही ताराच्या मध्ये बांबूच्या काड्या बांधाव्या लागत आहे.
वीज समस्यांकडे कानाडोळाच
पावसाळ्यापूर्वी वीज वितरणकडून दुरुस्तीच्या नावाखाली पैसे खर्च करून तारांवरील झाडांची छाटणी असो किंवा इतर किरकोळ कामे घाईगडबडीत केल्या जात असल्यामुळे ग्रामीण भागात भर पावसाळ्यात विजेच्या अनेक समस्या निर्माण होते. मात्र, याकडे महावितरण नेहमीच कानाडोळा करीत आले आहे.
मंगेश शेंडे, तरुण युवक पळसगाव.