घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती मिळवण्यासाठी प्रशासनाने मुदतवाढ द्यावी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 15:48 IST2025-06-09T15:46:38+5:302025-06-09T15:48:57+5:30
रेती वितरणाचा सोमवार शेवटचा दिवस : प्रशासनाने रेती वितरणाची मुदत वाढवावी

The administration should extend the deadline for Gharkul beneficiaries to get free sand!
शशिकांत गणवीर
लोकमत न्यूज नेटवर्क
भेजगाव : घरकूल लाभार्थ्यांना मोफत पाच ब्रास रेती मिळावी, म्हणून लाभार्थ्यांनी बराच आटापिटा केल्यानंतर प्रशासनाने घरकूल लाभार्थ्यांना मागणीनुसार रेती वितरण सुरू केले. मात्र, आठवडाभरातच रेती वितरणाची मुदत संपली असून, ९ जून सोमवारला सायंकाळी सहा वाजेपासून रेती वितरण बंद होणार असल्याने लाभार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. घरकूल लाभार्थ्यांना रेतीवाटप केवळ ओटघटकेची ठरली आहे.
शासनाने घरकूल मंजूर केल्यानंतर रेतीघाट लिलाव केले नाही. परिणामतः लाभार्थ्यांची घरे अर्धवट राहिली. पूर्ण उन्हाळा रेती अभावी बांधकामे रखडली. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रेती उपलब्ध केली. मात्र, तीही काही दिवसच रेती वितरण केल्याने हजारो लाभार्थी रेतीपासून वंचित राहिले. परिणामतः घरकूल लाभार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे.
मूल तालुक्यात नऊ रेती घाटांचे लिलाव झाले असून, तीन घाट घरकूल लाभार्थ्यांसाठी राखीव ठेवले गेले, तर लिलाव झालेल्या घाटांमधून १० टक्के रेतीसाठा घरकूल लाभार्थ्यांना देण्याच्या शासनाच्या वतीने तालुका प्रशासनाने आदेश काढले. मात्र, १० जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत पावसाचे दिवस असल्याने सदर उत्खनन बंद होणार असल्याचे आदेशात नमूद आहे. त्यामुळे सोमवारपासून रेती वितरण बंद होईल.
तालुक्यातील डोंगरगाव, राजोली, कोसंबी, मूल, आकापूर, नलेश्वर मो, चक नलेश्वर, भेजगाव, हळदी, चक दहेगाव आदी घाटांचे लिलाव झाले असून, यातून प्रशासनाने ४० हजार ब्रास रेती उत्खनन करायची आहे. यापैकी घरकूल लाभार्थ्यांना जवळपास चार हजार ब्रास रेती राखीव आहे. मात्र, घरकूल लाभार्थ्यांना रेतीची उचल करण्याकरिता काही दिवसांचा कालावधी मिळाल्याने पाच टक्केही रेती सद्यःस्थितीत लाभार्थ्यांना वितरित झाली नाही. त्यामुळे हजारो घरकूलधारक रेती मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सोमवारपासून रेती वितरण बंद झाल्यास लाभार्थ्यांचा हिरमोड होणार असल्याने रेती वितरणाची मुदत वाढवावी, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.
१० टक्के रेतीसाठा घरकूल लाभार्थ्यांना देण्याच्या शासनाच्या वतीने तालुका प्रशासनाने आदेश काढले. मात्र, १० जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत पावसाचे दिवस असल्याने सदर उत्खनन बंद होणार असल्याचे आदेशात नमूद आहे. त्यामुळे सोमवारपासून रेती वितरण बंद होईल.
रेती घाटाचे अंतर अधिक, भाडे न परवडणारे
मूल तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यांना राखीव केलेल्या रेती घाटांचे व काही गावांचे अंतर जास्त असल्याने ट्रॅक्टर भाडे अधिक लागत आहे. परिणामतः शासनाची मोफत रेतीही लाभार्थ्यांना परवडणारी राहिली नाही. त्यामुळे गावाजवळ असलेल्या घाटातूनच रेती मिळावी, अशी मागणी लाभार्थ्यांची आहे.
"घर बांधकामासाठी उन्हाळ्यात रेती मिळाली नाही. परिणामतः घरकुलाचे बांधकाम रखडले. सद्यःस्थितीत रेती वाहतुकीसाठी वाहने मिळत नसून, दिलेल्या मुदतीत लाभार्थ्यांना रेती पोहोचणे कठीण आहे. त्यामुळे प्रशासनाने रेती वितरणाची मुदत वाढवावी."
- एकनाथ शेंडे, घरकूल लाभार्थी, येजगाव