बीज प्रक्रिया संचासाठी दिले जाणार १० लाखांपर्यंत अनुदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 16:28 IST2024-07-23T16:26:37+5:302024-07-23T16:28:49+5:30
जुलैअखेरपर्यंत अर्जाची मुदत : शेतकरी कंपनी ठरणार पात्र

Subsidy up to 10 lakhs to be provided for seed processing sets
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या वतीने अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य योजनेअंतर्गत बीजप्रक्रिया संचासाठी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी, संघ हे आपले अर्ज ३१ जुलै २०२४ पर्यंत तालुका कृषी कार्यालयात सादर करू शकतात, बीजप्रक्रिया प्रकल्प उभारणीस प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १० लाख यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान दिले जाणार आहे.
या योजनेसाठी नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी किंवा संघ पात्र असेल. लाभार्थी शेतकरी उत्पादक कंपनी, संघ यांनी तालुका कृषी कार्यालयाने अर्जाला मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रीयीकृत बँकेकडे प्रस्ताव सादर करावा, बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित शेतकरी, उत्पादक कंपनी, संघ अनुदानाच्या लाभास पात्र राहणार आहे. लाभार्थी शेतकरी उत्पादक कंपनी, संघ यांनी अर्ज करताना ज्या कार्यक्षेत्रात कंपनी आहे, त्या कार्यालयात अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्जासोबत शेतकरी उत्पादन कंपनी, नोंदणी प्रमाणपत्र, कमिटी ठराव आवश्यक आहे.
काय आहे अन्न व पोषण सुरक्षा कडधान्य योजना?
- बीजप्रक्रिया संच उभारणीस प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १० लाख रुपये यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान दिले जाणार आहे.
- योजनेसाठी नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी किवा संघ पात्र असेल. यासाठी प्रथम तालुका कृषी विभाग त्यानंतर बँकेकडे अर्ज सादर करावा.
बीज प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी अनुदान
- बीज प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १० लाख यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढे अनुदान या योजनेत दिले जाणार आहे.
अर्ज करण्याची ३१ तारखेची मुदत
- शेतकरी उत्पादक कंपनी, संघ हे ३१ जुलै २०२४ अखेर कार्यक्षेत्रातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उत्पादक कंपनीस आवश्यक कागदपत्रांच्या छाननीनंतर पूर्वसंमती देण्यात येईल.
शेतकरी उत्पादक कंपन्यांनी करावा अर्ज
- नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी, संघ यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दिलेल्या मुदतीत अर्ज करावेत, ज्या आर्थिक वर्षात पूर्वसंमती देण्यात आली आहे, त्यांचे आर्थिक वर्षात बीज संच प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे.