आंदोलनाचा फटका : अल्ट्राटेक सिमेंट प्लांट अनिश्चित काळासाठी बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 12:57 IST2025-06-26T12:57:15+5:302025-06-26T12:57:55+5:30
Chandrapur : आंदोलन, प्रवेशबंदी व सुरक्षेच्या कारणावरून व्यवस्थापनाचा निर्णय

Strike hits: Ultratech Cement Plant closed indefinitely
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना (जि. चंद्रपूर) : कोरपना तालुक्यातील आवारपूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने अनिश्चित काळासाठी उत्पादन बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. बुधवार, २५ जून रोजी दुपारी ४ वाजता घेतलेल्या या निर्णयाने कामगारांमध्ये भीती पसरली आहे. कंपनी प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली प्रवेशबंदी, ठिय्या आंदोलन आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या निर्णयामागील प्रमुख कारणे आहेत.
राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन दिवसांपासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला उत्तर देताना व्यवस्थापनाने संपूर्ण प्लांट बंद करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. या निर्णयानंतर प्लांटमधील सर्व अधिकारी, स्थायी आणि कंत्राटी कामगारांना तातडीने बाहेर काढण्यात आले. रॉ मिल, दोन किलन व चारही सिमेंट मिल्स बंद करण्यात आल्या. आता केवळ पॉवर प्लांट कार्यरत आहे.
कारण काय ?
अवास्तव मागण्या व आंदोलनस्थळावरून जाहीररीत्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना सतत देण्यात येणाऱ्या धमक्यांमुळे अधिकारी धास्तावलेले आहेत. काही कामगार आंदोलनात सहभागी झाले तर काही कामगार कामावर येत असल्याने प्लांटमधील वातावरण अस्थिर झाले आहे. म्हणूनच आम्ही प्लांट अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर कंपनीतील एका अधिकाऱ्याने 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
हजारो कुटुंबांवर आर्थिक संकट
अचानक या निर्णयामुळे हजारो कुटुंबांवर उदरनिर्वाहाचे संकट निर्माण झाले आहे. औद्योगिक शांततेला तडा जाऊन स्थानिक रोजगार धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मध्यस्थीची मागणी
स्थानिक नागरिक, कामगार संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी त्वरित मध्यस्थी करावी, अशी मागणी केली आहे. आंदोलन, औद्योगिक हित आणि स्थानिक रोजगार यामध्ये समतोल साधणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
पालगाव रस्त्याचा प्रश्न ठरतोय वादग्रस्त केंद्रबिंदू
या आंदोलनामागील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पालगाव रस्ता, जो अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे स्थानिक जनता आणि कामगारांमध्ये नाराजी होती. त्या पार्श्वभूमीवर आंदोलनाला वेग मिळाला आहे.
औद्योगिक वातावरणावर परिणामाची शक्यता
औद्योगिक शांतता आणि स्थानिक हित यामध्ये समन्वय साधण्याची ही वेळ आहे. या प्रश्नावर योग्य तोडगा निघाला नाही, तर जिल्ह्यातील औद्योगिक वातावरण आणि रोजगार यावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
"पालगावचा रस्ता हा अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न आहे. कामगारांची पिळवणूक आणि स्थानिक जनतेच्या समस्या लक्षात घेऊन आम्ही आवाज उठवला आहे. आमच्या मागण्या अत्यंत शुल्लक असून, कंपनीने त्या तातडीने मान्य कराव्यात. आमदार या नात्याने स्थानिक जनतेच्या हक्कांसाठी लढणे हे माझे कर्तव्य आहे."
- देवराव भोंगळे, आमदार, राजुरा विधानसभा