"ना बँड, ना बाजा, तरीही लग्न खास !" चंद्रपूरमध्ये सत्यशोधक विवाहांची चर्चा तेजीत
By परिमल डोहणे | Updated: June 2, 2025 17:05 IST2025-06-02T17:04:36+5:302025-06-02T17:05:00+5:30
म. फुलेंच्या विचारांची पुनर्रचना : सत्यशोधक विवाह पुन्हा जनतेच्या मनात

"No band, no baja, still the wedding is special!" Discussion of Satyashodhak weddings is increasing in Chandrapur
परिमल डोहणे
चंद्रपूर : लग्नसोहळा 'मेमोरेबल' करण्याच्या अनुषंगाने लग्नात लाखो रुपये उधळून धुमधडाक्यात करण्याचा जणू ट्रेंडच आजच्या तरुण पिढीने सुरू केला आहे. मात्र, या ट्रेंडच्या ओझ्यात अनेक पालक कर्जबाजारी होत आहेत. अशाही स्थितीत चंद्रपूर जिल्ह्यातील काही सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या समाजसुधारकांनी सुरू केलेली 'ना बँड, ना बाजावाली' सत्यशोधक विवाह पद्धती त्या तरुणांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालत आहे.
लग्नाच्या वरातीत कानाच्या कानठिळ्या बसविणारा डीजे, जेवणाच्या बुफेत न मोजता येणारे अन्नपदार्थ, महागडे कपडे, संगीत अशाप्रकारचा देखावा करून लग्न करण्याकडे आजकाल अनेकजण पसंती देत आहेत. यासाठी काही वडील शेत विकतात वा गहाण टाकतात. तर काही जण बँकेचे कर्ज घेतात अन् आयुष्यभर फेडत बसतात. मात्र, मागील काही वर्षापासून चंद्रपुरात सत्यशोधक विवाहपद्धती रुजविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. केवळ थोर महापुरुषांच्या प्रतिमेपुढे एकमेकांना जीवनभर साथ देण्याची शपथ घेऊन साध्या पद्धतीने विवाह लावले जात आहेत.
गावतुरे दाम्पत्यांचा पुढाकार
अखिल भारतीय माळी महासंघाच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे विवाह लावण्यात येतात. विवाह पद्धती रुजवण्याच्या दृष्टीने चंद्रपुरातील सामाजिक चळवळीतील डॉ. राकेश गावतुरे, डॉ. अभिलाषा गावतुरे दाम्पत्यांनी पुढाकार घेतला आहे. सावलीचे सुनील कावळे हे सद्गृहस्थ सत्यशोधक विवाह लावण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून पौरोहित्य करत आहेत.
म. फुले यांनी केली सुरूवात
सत्यशोधक विवाह पद्धती म. फुले यांनी १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर सुरू केली. पुरोहितांच्या मध्यस्थीशिवाय, कर्मकांडविरहित विवाह पद्धती रूढ करणे, जातीभेद, सामाजिक विषमता नष्ट करणे, विशेषतः शूद्र आणि अतिशूद्र समाजाला जमीनदार, शेटजी आणि पुरोहितांच्या शोषणापासून मुक्त करण्याच्या अनुषंगाने ही पद्धत सुरू केली होती.
अशी आहे सत्यशोधक विवाह पद्धती
- कर्मकांडविरहित, पुरोहितमुक्त आणि सामाजिक समतेवर आधारित विवाह पद्धती आहे. या पद्धतीत पारंपरिक वैदिक मंत्रांचा वापर न करता साध्या, मराठी मंगलाष्टकांचा उपयोग केला जातो.
- विवाहपूर्व तयारी : वधू-वर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी परस्पर संमतीने विवाह ठरवला जातो. विवाहस्थळ साधे असते, मंडप सजवला जातो, पण अनावश्यक खर्च टाळला जातो.
- विवाह विधी : मंगलाष्टक विवाह सोहळ्यात 3 पुरोहिताऐवजी वधू-वर किंवा उपस्थित व्यक्त्ती मराठी मंगलाष्टक म्हणतात. हे अष्टक सामाजिक समता, प्रेम आणि सहजीवनाचे महत्त्व अधोरेखित करतात. पांगरांच्या अक्षतांच्या जागी प्रेमाची प्रतीक असलेल्या फुलांचा वर्षाव करण्यात येतो.
- सत्यशोधक प्रतिज्ञा : वधू आणि वर परस्पर संमतीने एकमेकांना सहजीवन, समता, विश्वास आणि परस्पर आदराची प्रतिज्ञा घेतात. ही प्रतिज्ञा सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांवर आधारित असते.
- कन्यादान नसणे: पारंपरिक कन्यादानाचा रिवाज या पद्धतीत नाही, कारण स्त्रीला वस्तू मानण्याच्या संकल्पनेला फुले यांनी विरोध केला होता.
- सिंदूर, मंगळसूत्र आणि अन्य प्रतीके : वधू-वर परस्पर संमतीने मंगळसूत्र, सिंदूर किंवा हार घालू शकतात; पण याला अनिवार्यता नसते. याचा अर्थ दोघांच्या परस्पर प्रेम आणि विश्वासाला प्राधान्य दिले जाते.
- विवाहाची नोंदणी: विवाहानंतर कायदेशीर विवाह ७ नोंदणी केली जाते, ज्यामुळे विवाहाला सामाजिक आणि कायदेशीर मान्यता मिळते.
- सामाजिक संदेश : सत्यशोधक विवाहात उपस्थितांना समतेचा संदेश दिला जातो. हा सोहळा साधा, कमी खर्चाचा आणि सर्वांना सामावून घेणारा असतो.
"म. फुलेंनी ज्या उद्देशाने सत्यशोधक विवाह सुरू करून कष्टकरी, शेतकरी, गोरगरीब जनतेच्या शोषणाला पायबंद घालण्याचा जो कार्यक्रम दीडशे वर्षांपूर्वी केला होता तोच उद्देश ठेवून सत्यशोधक विवाह पद्धती रुजविण्याचा प्रयत्न करत आहोत. शेतकरी, कष्टकरी जनतेला कर्जाच्या पाशातून दूर ठेवण्यासाठी आणि शोषणमुक्त करण्यासाठी सत्यशोधक विवाह पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे."
- डॉ. अभिलाषा गावतुरे, सामाजिक कार्यकर्ता, चंद्रपूर