डीबीटी न केल्यास मानधन होणार बंद ! लाभार्थ्यांनी करावी ही अट पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 16:46 IST2025-01-20T16:44:38+5:302025-01-20T16:46:01+5:30
विविध योजनांचे मानधन थेट खात्यात : अनेक लाभार्थीचे डीबीटी बाकी

Honorarium will be stopped if DBT is not done! Beneficiaries must fulfill this condition
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शासनाकडून श्रावणबाळ, इंदिरा गांधी, संजय गांधी योजनेच्या माध्यमातून निराधार व्यक्तींना ठराविक मानधन अदा केले जाते. तहसील स्तरावरून मानधन लाभार्थीच्या खात्यात जमा केले जायचे. आता मात्र पुढील महिन्यात थेट डीबीटीमार्फत लाभार्थीच्या खात्यात मानधन जमा होणार आहे. मात्र, लाभार्थीनी डीबीटी न केल्यास मानधन बंद होणार आहे.
संजय गांधी, श्रावणवाळ, इंदिरा या निराधार योजनांच्या लाभासाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थीची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता. तो निधी बँकेकडून होता. या प्रक्रियेस विलंब होत होता. त्यामुळे वयोवृद्ध लाभार्थीना अनुदानासाठी बँकेत खेटे घालावे लागत होते.
अनेकांचे डीबीटी बाकी...
जिल्ह्यात श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या एकूण लाभार्थीपैकी काही लाभार्थीनी सर्व कागदपत्रे जमा करून आपल्या खात्याला डीबीटी केली आहे. ज्या लाभार्थीनी डीबीटी केली नसेल त्यांनी डीबीडी करून घ्यावी.
डीबीटी म्हणजे काय?
डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही भारत सरकारची एक कल्याणकारी योजना आहे. या योजनेंतर्गत पात्र व्यक्तींना सबसिडी आणि फायदे थेट त्याच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात. या योजनेमुळे पारदर्शकता वाढते. या योजनेमुळे फसवणूक होणार नाही.
"लाभार्थ्यांचे मानधन आता डीबीटी च्या माध्यमातून होणार आहे. प्रत्येक लाभार्थ्यांनी डीबीटी सुविधेकरिता आधारकार्ड, बँकपासबुकची झेराक्स, मोबाईल क्रमांक तलाठी, कोतवालकडे जमा करावी. मानधन थेट बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे."
- राजू धांडे, नायब तहसीलदार, चंद्रपूर