बँक भरतीवर संशय ! जिल्हा बँकेविरोधात आमरण उपोषण सुरूच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 14:36 IST2025-01-23T14:34:57+5:302025-01-23T14:36:02+5:30
Chandrapur : घोटाळ्याचा गंध; बँक संशय दूर करतील?

Doubts over bank recruitment! Fast to death continues against district bank
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ३५८ जागांच्या भरती प्रक्रियेचा शेवटचा टप्पा म्हणून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहे. बँक व्यवस्थापन आणि भरती प्रक्रिया राबविणारी यंत्रणा सर्व बाबी रीतसर, कायदेशीर असल्याचे सांगत असली तरी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एकूणच भरती प्रक्रियेत घोटाळ्याचा गंध येत असल्याची चर्चा आहे. याचा उलगडा बँक करतील काय? असेही बोलले जात आहे.
बँकेने भरती प्रकियेचा भाग म्हणून अर्ज करणाऱ्या उमेदवारांची परीक्षा घेतली. या परीक्षेत उत्तरे लिहिताना निगेटिव्ह मार्किंग नव्हती. ज्यांना काहीच येत नाही, अशांनीही जे होईल ते पाहून घेऊ म्हणून पूर्ण पेपर सोडविला. काहींनी अभ्यासपूर्ण पद्धतीने पेपर सोडविला. अनेकांना पेपर सोडविताना उत्तरांचे पर्याय बदलत असल्याचा प्रत्यय आला. यामुळे परीक्षा पुढे ढकलली होती. यानंतर पुन्हा परीक्षा झाली. कोणतीही पद भरती घेताना ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली. त्यातील किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अशा उमेदवारांची यादी प्रकाशित करणे आवश्यक होते. बँकेने ते केले नाही. किती लोकांना बँकेने मुलाखतीसाठी बोलविले. नावेही जाहीर केली नाही. भरती प्रक्रियेत एका माजी संचालकाने पडद्यामागची भूमिका वठविल्याची चर्चा आहे. त्या संचालकाच्या राजीनामा देण्यामागील कारणही भरती प्रक्रियाच असल्याचीही चर्चा आहे.
आंदोलनकर्त्याला ऑफर दिल्याचीही चर्चा
या भरती प्रक्रियेच्या विरोधात काही प्रश्न उपस्थित करून जिल्हा बँकेच्या अगदी समोरच मनोज पोतराजे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण मागे घेण्यासाठी बँकेच्या माध्यमातून ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, ती पोतराजे यांनी नाकारल्याचीही चर्चा आहे.
३५८ शिपाई व लिपिक पदांच्या जागा, लोकप्रतिनिधी गप्प
जागांची भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही लोकप्रतिनिधींनी चांगलाच आवाज मोठा केला होता. मात्र, नंतर त्यांनीही आपल्या आक्षेपाच्या तलवारी मॅन केल्याने पीडित उमेदवारांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एका माजी संचालकाची महत्त्वाची भूमिका
बँकेच्या संचालकपदावरून दूर झालेल्या एका माजी संचालकाने या भरती प्रक्रियेत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे. इतकेच नव्हे तर ज्या एजन्सीमार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली. ही एजन्सीही संबंधित संचालकाशी जुळलेली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
अध्यक्ष म्हणतात, नोकर भरती नियमानुसारच
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत म्हणाले, बँकेची पद भरती अतिशय पारदर्शक आहे. सर्व बाबी न्यायालयाच्या निर्देशानुसारच पाळण्यात आलेल्या आहेत. आम्ही जिथे जिथे आक्षेप घेण्यात आला. त्या सर्वांना कागदपत्रे दाखविली. त्यांचे आक्षेप दूर केले. आता भरती प्रक्रियेला नाहक गालबोट लावण्याचे राजकारण सुरू आहे