८२७ ग्रामपंचायती, ८० हजार झाडांचे लक्ष्य! चंद्रपूरमध्ये ‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेतून वृक्षलागवडीची जोरदार तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 16:45 IST2025-06-14T16:44:38+5:302025-06-14T16:45:44+5:30
जिल्हा परिषद प्रशासनाकडून तयारी सुरू : उपक्रमात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा राहणार सहभाग

827 Gram Panchayats, target of 80 thousand trees! Vigorous preparations for tree plantation in Chandrapur through the 'Ek Peed Maa Ke Naam' campaign
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : 'एक पेड माँ के नाम' या अभिनव संकल्पनेतून केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने देशभर वृक्षलागवडीला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान १०० रोपांची लागवड करावी, अशा सूचना पंचायतराज संचालनालयामार्फत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातही सर्व ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात हजारो वृक्षांचे रोपण करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून, जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने यासाठी तयारीही सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक रोपाला लागवड करणाऱ्या व्यक्तीच्या मातोश्रींचे नाव दिले जाणार आहे. या भावनिक संकल्पनेमुळे वृक्षलागवडीस वैयक्तिक व सामाजिक समर्पणाची भावनाही जोडली जाणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ग्रामस्वराज्य संकल्पनेशी सुसंगत अशी ही मोहीम केवळ पर्यावरण संवर्धनापुरती मर्यादित नसून, ग्रामीण भागातील नागरिकांना सामाजिक बांधिलकीची भावना जागवणारी ठरत आहे. शासनाच्या निर्देशाचे तंतोतंत पालन करून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने १०० झाडे लावल्यास, ८० हजारांवर वृक्षारोपण होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा उपक्रम
'एक पेड माँ के नाम' हा उपक्रम केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने देशभर राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यात वृक्षारोपणाला झाली सुरुवात
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात ५ जूनपासून या मोहिमेंतर्गत काही ठिकाणी वृक्षारोपण करण्यास सुरुवात झाली आहे. या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
'मर' लागलेल्या झाडांच्या जागी ३१ डिसेंबरपूर्वी पुन्हा रोपण
'एक पेड माँ के नाम' या मोहिमेतून जी रोपे योग्यरीत्या तग धरू शकणार नाहीत, त्यांच्या जागी ३१ डिसेंबरपूर्वी पुनर्लागवड केली जाणार आहे.
जिल्ह्यातील ८२७ग्रामपंचायती समाविष्ट !
जिल्ह्यात ८२७ ग्रामपंचायती असून, सर्व ठिकाणी रोपांची लागवड केली जाणार आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
'एक पेड माँ के नाम' मोहिमेची तयारी
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना सहभागी करून घेत विशेष वृक्षलागवड मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाणार आहे.
मातोश्रींच्या नावाने झाडांना ओळख
गाव परिसरात वृक्ष लागवड करण्यात आल्यानंतर त्या प्रत्येक झाडांचे संगोपन करणारी व्यक्ती आपल्या आईच्या नावाने त्या झाडाचे नामकरण करणार असल्याची संकल्पना आहे.
शासकीय कार्यालये, शाळांच्या आवारात झाडे लावणार
ग्रामपंचायत व्यतिरिक्त शाळा, अंगणवाड्या, आरोग्य उपकेंद्र, तलाठी व मंडळ कार्यालये अशा सार्वजनिक ठिकाणी झाडे लावण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे.
"वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे. 'एक पेड माँ के नाम' या मोहिमेमुळे ग्रामीण स्तरावर पर्यावरण जागृती आणि जबाबदारीची भावना निर्माण होईल. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये या मोहिमेंतर्गत वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासकीय तयारी सुरू आहे."
- पुलकित सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर.