नवी दिल्ली - ज्या ग्राहकांना इंटरनेटची गरज नाही, त्यांना केवळ कॉलिंग आणि एसएमएससाठी महागडे रिचार्ज का करावे लागतात? या प्रश्नावर आता भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) कठोर पाऊल उचलण्याचे संकेत दिले आहेत.
केवळ व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएस सेवा देणारे स्वस्त प्लॅन कंपन्यांनी अनिवार्य उपलब्ध करून द्यावेत, असा प्रस्ताव ‘ट्राय’ने मांडला असून, त्यावर हरकती व सूचना नोंदवण्यासाठी आता ५ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
नेमके प्रकरण काय?
सध्या बहुतांश रिचार्ज प्लॅन हे डेटा (इंटरनेट) सेवांशी जोडलेले असतात. ज्यांना इंटरनेट नको आहे, त्यांनाही विनाकारण डेटाचे पैसे मोजावे लागतात. ट्रायने यापूर्वी कंपन्यांना असे प्लॅन आणण्यास सांगितले होते, मात्र कंपन्यांनी त्या प्लॅन्सचे दर अवाजवी ठेवले.
परवडणारे प्लॅन आणणे कंपन्यांना बंधनकारक
टेलिकॉम कंपन्यांनी ग्राहकांसाठी फक्त कॉलिंग आणि एसएमएस असलेले परवडणारे प्लॅन आणणे बंधनकारक असेल. यामुळे अनेकांचा फायदा होईल.
डेटा सेवा नसलेल्या प्लॅन्सचे दर त्या प्रमाणात कमी असावेत, जेणेकरून सामान्य ग्राहकाचा खिसा कापला जाणार नाही. आता ५ मेपर्यंत कोणालाही यावर आपली मते मांडता येतील. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा ज्येष्ठ नागरिक, ग्रामीण भागातील जनता आणि केवळ कामापुरता फोन वापरणाऱ्या ग्राहकांना होणार आहे.
