नवी दिल्ली : अमेरिकेने इराणच्या आण्विक केंद्रांवर हल्ले केल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव प्रचंड वाढला असून, तेहरानने जगातील सर्वात महत्त्वाचा तेल मार्ग असलेल्या होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याची धमकी दिली आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच भारताने जूनमध्ये रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी प्रचंड प्रमाणात वाढवली आहे.
जूनमध्ये भारताने रशियाकडून केलेली तेल खरेदी पश्चिम आशियाई पुरवठादारांकडून आयात केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. भारतीय रिफायनरी कंपन्या जूनमध्ये रशियाकडून दररोज २० ते २२ लाख बॅरल कच्चे तेल खरेदी करत आहेत. ही दोन वर्षांतील सर्वाधिक खरेदी आहे. यासोबतच, इराक, सौदी अरेबियासह इतर देशांकडूनही खरेदीत मोठी वाढ झाली आहे.
भारताच्या व्यापाराला मोठा फटका
इराण आणि इस्रायलमधील युद्ध आणखी वाढल्यास त्याचा इराक, जॉर्डन, लेबनॉन, सीरिया आणि येमेनसह पश्चिम आशियाई देशांसोबतच्या भारताच्या व्यापारावर मोठा परिणाम होईल.
युद्धाचा परिणाम भारताच्या इराण आणि इस्रायलला होणाऱ्या निर्यातीवर आधीच झाला आहे. या युद्धामुळे आपण आता मोठ्या संकटात सापडलो आहोत. पश्चिम आशियाई देशांसोबतच्या व्यापारावर परिणाम होईल.
भारताची इराणला निर्यात
एकूण निर्यात > १.२४ अब्ज डॉलर्स
एकूण आयात > ४४१.८ अब्ज डॉलर्स
बासमती तांदूळ > ७५.३२ कोटी डॉलर्स
केळी > ५.३२ कोटी डॉलर्स
सोयाबीन पेंड > ७.०६ कोटी डॉलर्स
बंगाली हरभरा > २.७९ कोटी डॉलर्स
चहा > २.५५ कोटी डॉलर्स
होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, तरी फटका नाही
भारताची मोठी तेल आयात होर्मुझ सामुद्रधुनीतून होते. मात्र आपल्याकडे रशियापासून अमेरिका, ब्राझीलपर्यंत, कोणत्याही कमतरतेची पूर्तता करण्यासाठी पर्यायी स्रोत सहज उपलब्ध आहेत. रशियन तेल होर्मुझमधून तून येत नाही. त्यामुळे सामुद्रधुनी बंद केली तरी भारताला फटका बसण्याची शक्यता कमी आहे.