PM Kisan 21st installment : सणासुदीचा काळ संपल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनाचा पुढील हप्ता कधी जमा होणार? जर तुम्हीही याच शेतकऱ्यांपैकी एक असाल, तर तुमच्यासाठी एक मोठे अपडेट आहे. मीडिया रिपोर्टनुसार, केंद्र सरकार पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता याच आठवड्यात जारी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपयांची रक्कम थेट जमा होणार आहे. मात्र, यावेळीही काही शेतकरी असे आहेत, ज्यांना या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते.
ई-केवायसी (E-KYC) नसेल तर २००० रुपये मिळणार नाहीत!
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, त्यांच्या बँक खात्यात २००० रुपयांची रक्कम जमा होणार नाही. त्यामुळे, २१ वा हप्ता जमा होण्यापूर्वी सर्व पीएम किसान लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे गरजेचे आहे. पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता ऑगस्टमध्ये जमा झाला होता. त्यावेळी सुमारे ९.८ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्यात आले होते.
काय आहे पीएम किसान योजना?
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना हा भारत सरकारचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना २०१९ च्या अंतरिम अर्थसंकल्पात सुरू करण्यात आली होती. या योजनेंतर्गत दर चार महिन्यांनी २००० रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. म्हणजेच, वर्षाला शेतकऱ्याला एकूण ६००० रुपयांची आर्थिक मदत मिळते.
वाचा - रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
पीएम किसान योजनेच्या लाभासाठी आवश्यक अटी
- शेतकऱ्याकडे २ हेक्टरपर्यंतची लागवडीयोग्य जमीन असावी आणि त्याचे नाव जमीन नोंदीमध्ये समाविष्ट असावे.
- लाभ मिळवण्यासाठी आधार कार्डशी जोडलेले बँक खाते असणे अनिवार्य आहे.
- योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी पीएम किसान पोर्टलवर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
- २००० रुपयांचा हप्ता थेट डीबीटीद्वारे पाठवला जातो, त्यामुळे बँक खाते चालू आणि अचूक असणे आवश्यक आहे.
- पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले मिळून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो.
