Budget 2026: बांगलादेशसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या शेजारील देशाला अधिक आर्थिक सहकार्य देण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत यावेळेस बांगलादेशसाठीच्या निधीच्या वाटपात मोठी वाढ करण्यात आली असून, २०२५ च्या तुलनेत हा निधी ७४ टक्क्यांनी वाढवला आहे.
बांगलादेशसाठी ६० कोटी रुपयांची तरतूद
भारत सरकारनं अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये बांगलादेशला ६० कोटी रुपये देण्याचं जाहीर केले आहे. गेल्या अर्थसंकल्पात शेजारील देशाला ३४.४८ कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. परराष्ट्र मंत्रालयानं बांगलादेशसाठी १२० कोटी रुपयांची मागणी केली होती, जी अर्थसंकल्पात निम्मी करण्यात आली आहे. मोहम्मद युसूफ यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारनं बांगलादेशची कमान सांभाळल्यापासून दोन्ही देशांतील संबंधांवर परिणाम झाला आहे, तरीही भारत सरकार अत्यंत सावधगिरीनं संबंध पुढे नेत आहे.
स्वस्त EV, सीएनजी ब्लेंडिंग! बॅटरी उत्पादनासाठी Budget चा बूस्ट; सरकारकडून मोठी सूट, जाणून घ्या
चाबहार बंदरासाठी तरतूद नाही
इराणमधील चाबहार बंदराबाबत या अर्थसंकल्पातून एक वेगळी माहिती समोर आली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ आणि २०२६ मध्ये या बंदरासाठी प्रत्येकी ४०० कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं होतं. मात्र, अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये चाबहार बंदरासाठी कोणताही निधी देण्यात आलेला नाही.
अफगाणिस्तान आणि नेपाळचा निधी
तालिबान शासित अफगाणिस्तानलाही भारताकडून मिळणाऱ्या निधीत ५० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. भारत सरकारनं अफगाणिस्तानसाठी १५० कोटी रुपयांचं वाटप केलं आहे. तसंच, नेपाळला या अर्थसंकल्पात ८०० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे.
भूतानला मिळणार सर्वाधिक मदत
शेजारील देशांमध्ये भारत सर्वाधिक मदत भूतानला करणार आहे. भारत सरकारने भूतानसाठी २०२६ च्या अर्थसंकल्पात २,२८८ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. यामध्ये १,७६९ कोटी रुपयांचे अनुदान आणि ५२० कोटी रुपयांच्या कर्जाचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भूतानच्या निधीत १७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

