Ahmedabad Plane Crash : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक अतिशय दुःखद घटना घडली आहे. अहमदाबादहून लंडनला निघालेलं एअर इंडियाचं ड्रीमलायनर विमान AI171 उड्डाण करत असतानाच कोसळलं. या अपघाताने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. या विमानात २४२ प्रवासी होते, ज्यांच्या मनात फक्त एकच स्वप्न होतं – ते म्हणजे लंडनमध्ये पोहोचण्याचं. कुणी व्यवसायासाठी, कुणी शिक्षणासाठी, तर कुणी आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी निघाले होते. पण दुर्दैवाने, हा प्रवास एका भीषण अपघातात बदलला आणि त्यांची सारी स्वप्ने क्षणार्धात भंग पावली.
लंडनला जाण्यासाठी किती भाडे?
प्रवाशांनी एअर इंडियाच्या या विमानासाठी हजारो ते लाखो रुपये खर्च केले होते.
- इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करणाऱ्यांनी ५६,००० रुपयांपासून तिकीट दर होते.
- प्रीमियम इकॉनॉमी क्लासचे भाडे ८९,००० ते ९०,००० रुपये होते.
- बिझनेस क्लासच्या एका सीटसाठी ९६,००० ते १.५ लाखांपर्यंत तिकीट दर आहे.
- तर फर्स्ट क्लासच्या तिकिटासाठी ४,६४,००० ते ५ लाख रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागतात.
कसा घडला अपघात?
डीजीसीएकडून मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान AI171 अहमदाबादहून लंडनला जात होते. विमानात एकूण २ पायलट आणि १० केबिन क्रू मेंबरसह २४२ लोक होते. या दुःखद घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील विमानात होते, अशी माहिती मिळाली आहे.
विमानाने अहमदाबादमधील धावपट्टी २३ वरून दुपारी १.३९ वाजता उड्डाण केले. उड्डाणानंतर विमानाने एटीसीला (Air Traffic Control) 'MAYDAY' (आणीबाणीचा संदेश) कॉल दिला. परंतु, त्यानंतर एटीसीने केलेल्या कोणत्याही कॉलला विमानाकडून प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळातच विमान विमानतळाजवळील बाहेर जमिनीवर कोसळले.
वाचा - एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
या घटनेमुळे जीवितहानी आणि वित्तहानी किती झाली, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही, परंतु काही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.