जलजीवन मिशनचे अर्धवट बांधकाम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासनानंतर गावकऱ्यांनी आमरण उपोषण केले स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 17:17 IST2025-06-12T17:14:07+5:302025-06-12T17:17:17+5:30

Bhandara : आश्वासनानंतर १२ जूनचे आमरण उपोषण स्थगित, तामसवाडी गावातील प्रकार

Villagers suspend hunger strike after assurance to complete partial construction of Jaljeevan Mission in two months | जलजीवन मिशनचे अर्धवट बांधकाम दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आश्वासनानंतर गावकऱ्यांनी आमरण उपोषण केले स्थगित

Villagers suspend hunger strike after assurance to complete partial construction of Jaljeevan Mission in two months

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) :
तामसवाडीत जलजीवन मिशनचे काम अडल्याने गावकऱ्यांना अद्याप पाणी मिळाले नाही. योजनेत मोठ्या प्रमाणात गौडबंगाल करण्यात आल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी पंचायत समितीसमोर १२ जूनपासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु दोन महिन्यांत योजना पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी आमरण उपोषण स्थगित केले आहे. लेखी आश्वासन मिळाल्याने तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचे उपसरपंच अनिल वासनिक यांनी सांगितले आहे.


वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या तामसवाडीत नळकनेक्शन धारकांची मागणी ३५० कुटुंबांची आहे. गावात फक्त १५० कुटुंबीयांना नळकनेक्शन देण्यात आले आहे. या कुटुंबीयांना नळकनेक्शन देण्यासाठी जलजीवन मिशन हर घर नल योजना मंजूर करण्यात आली. योजनेचे काम १ मार्च २०२३ ला सुरू करण्यात आले. योजनेवर ९३ लाख ७५ हजार रुपये खर्च करण्यात आले. यात विंधन विहीर बांधकामात ८४ हजार रुपये खर्च दाखविण्यात आले. 


वारेमाप खर्च
ट्युब वेलच्या कामात २ लाख २३ हजार रुपयांचा खर्च करूनही पाणी मिळाले नाही. पंपिंग मशिनरी १ लाख ३८ हजार आणि पंपगृहाच्या निर्मितीसाठी २ लाख ५८ हजार रुपयांचा निधी खर्च झाला. उर्ध्व नलिका १४ लाख ४९ हजार रुपये खर्च करण्यात आले. पाणीपुरवठा करण्याच्या वितरण नलिकांवर ३९ लाख १७ हजार रुपये खर्च केले.


निवेदनावर यांच्या स्वाक्षऱ्या
गावागावांत जलजीवन मिशन कोरडाच आहे. यामुळे गावकरी संतापले आहेत. १२ जूनपासून पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. निवेदनावर सरपंच सुनीता इटणकर, उपसरपंच अनिल वासनिक, वंदना अनकर, हिरा लांजेवार, रिता इखार, वंदना बनकर यांनी स्वाक्षरी केलेल्या होत्या. मात्र आता आश्वासन मिळाल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. 


बैठकीत योजना पूर्ण करण्याचा निर्णय
१० जूनला ग्रामपंचायत सभागृहात गावकरी आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात दोन महिन्यांत योजना पूर्ण करण्याचे आश्वासन गावकऱ्यांना देण्यात आले. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता हर्षदीप बन्सोड, कनिष्ठ अभियंता महेश आगलावे, कनिष्ठ अभियंता विजय सिरसाम, कनिष्ठ अभियंता महेश शेंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठलराव रहमतकर, सरपंच सुनीता इटनकर, उपसरपंच अनिल वासनिक, ग्रामसेवक बाहेवार यांच्यासह सदस्य व गावकरी उपस्थित होते.

Web Title: Villagers suspend hunger strike after assurance to complete partial construction of Jaljeevan Mission in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.