मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा; २०७२ शेतकऱ्यांची पिके मातीमोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 14:51 IST2025-05-28T14:50:53+5:302025-05-28T14:51:39+5:30

प्रशासनाचा प्राथमिक नजरअंदाज अहवाल : यंदा तरी आर्थिक मदत मिळणार काय?

Pre-monsoon rains hit; 2072 farmers' crops destroyed | मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा; २०७२ शेतकऱ्यांची पिके मातीमोल

Pre-monsoon rains hit; 2072 farmers' crops destroyed

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
जिल्ह्यात गत सहा दिवसांपासून अवकाळी व मान्सूपूर्व पावसाने उन्हाळी पीक घेतलेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या पावसामुळे धान पिकासह अन्य पिके जमीनदोस्त झाल्याने तब्बल २०७२ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.


१९ ते २५ मेपर्यंत बरसलेल्या पावसाने जिल्हाभरातील ९७७हेक्टरमधील शेतपिके बाधित झाल्याचे प्रशासनाच्या प्राथमिक नजरअंदाज अहवालात म्हटले आहे. परिणामी एकूण पंचनाम्यानंतर नुकसानीचा आकडा वाढणार यात शंका नाही.


भंडारा तालुक्यातील ६९५४ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली होती. त्यापैकी २५६ हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली असून ३३९ शेतकरी प्रभावित झाले आहे. मोहाडी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून ६७५ हेक्टरमधील पिके नुकसानग्रस्त झाली. यात १६०६ शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले आहे. तसेच तुमसर तालुक्यातील १२० शेतकरी प्रभावित झाले. तर लाखनी तालुक्यातील सात शेतकऱ्यांचा समावेश आहे. उन्हाळी हंगामात एकूण ७१ हजार २२१ हेक्टरमध्ये विविध पिकांची पेरणी करण्यात आली होती.


पवनी, साकोली आणि लाखांदूर निरंक
जिल्हा प्रशासनाच्या नुकसानीच्या प्राथमिक नजरअंदाज अहवालात पवनी, साकोली आणि लाखांदूर येथे नुकसान झाले नाही, असे दाखविण्यात आले आहे. एकंदरीत मात्र अड्याळ परिसरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 


उत्पादनाची आशा मावळली
उन्हाळी हंगामात मोठ्या हिमतीने अड्याळ परिसरातील शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाची लागवड केली होती. मात्र आलेल्या पावसाने डोळ्यादेखत होत्याचे नव्हते केले. धान जमीनदोस्त झाले. कडपांना अंकुर फुटले. शेतपीक पिकविण्यासाठी जीवाचे रान केले. मात्र शेवटी अस्मानी संकटाने उत्पादनाची आशा मावळली आहे. पसाभर तरी धान पदरी लाभणार काय, अशी चर्चा आता शेतकऱ्यांमध्ये होत आहे . 


३३ टक्क्यांवर बाधित
जिल्हा प्रशासनाच्या नजरअंदाज प्राथमिक अहवालात ३३ टक्केच्याआत बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ६७७ इतकी आहे. तर ३३ टक्क्याच्यावर बाधित झालेल्या शेतकऱ्यांची संख्या १३९५ आहे. नुकसान झालेल्यामध्ये उन्हाळी भात, भाजीपाला व फळ पिकांचा समावेश आहे. झालेले नुकसान हे अंदाजीत असून प्रत्यक्ष सर्व्हेक्षणानंतर आकडेवारीत बदल होवू शकतो, असेही प्रशासनाने सांगितले.

Web Title: Pre-monsoon rains hit; 2072 farmers' crops destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.